देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाने उच्चांक गाठला असून तिथे प्रदूषणाच्या पातळीने लाल बावटा लावला आहे.
मुंबई- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाने उच्चांक गाठला असून तिथे प्रदूषणाच्या पातळीने लाल बावटा लावला आहे. हवेत धुके, धूर, धूलिकणांमध्ये भर पडल्याने वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिल्लीतील या परिस्थितीमुळे मुंबईकरांची धडधडवाढली आहे. याबाबत पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’च्या ‘सफर’ या प्रदूषण मापक यंत्रणेने मुंबई शहर परिसरात सध्या वायू प्रदूषणाची पातळी विरळ असल्याचे नमूद केले आहे.
‘सफर’ यंत्रणेअंतर्गत शहरातील विविध भागांत लावण्यात आलेल्या मोजमाप यंत्रणेनुसार काही ठिकाणी वायू प्रदूषणाची सध्याची पातळी चांगली, समाधानकारक तर काही ठिकाणी खराब नोंदवण्यात आली आहे. या नोंदी पाहता मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेण्याचे संकेत दिले आहेतच, पण सोबत न घाबरण्याचा सल्लाही दिला आहे.
राजधानी दिल्लीच्या पावलावर पाऊल टाकत मुंबईतही वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली जाईल का? अशी चिंता मुंबईकरांना सतावत आहे. ऑक्टोबर अखेरपासून शहर उपनगर परिसरात किमान तापमानाची पातळी घसरल्याने पहाटे, सायंकाळी वातावरणातील गारव्याने मुंबईकर सुखावला आहे. पण कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहिल्याने सकाळी, दुपारी घामटा काढणाऱ्या उकाडय़ाला सामोरे जावे लागत आहे.
या संमिश्र वातावरणाला मुंबईकर त्रासला असताना दिल्लीतील वायू प्रदूषणाची स्थिती पाहता चाकरमान्यांच्या मनात धाकधूक सुरू आहे. ‘सफर’ यंत्रणेअंतर्गत बोरीवली, मालाड, अंधेरी, वरळी, माझगाव, चेंबूर, नवी मुंबई आदी ठिकाणी प्रदूषण मोजमाप यंत्रके बसवण्यात आली आहेत. या यंत्रणेअंतर्गत ‘एअर क्वालिटी इंडेक्स’द्वारे वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यात येते.
वायू प्रदूषणात धूलिकण (पीएम १०) आणि सूक्ष्मकण (पीएम २.५) हे महत्त्वाचे घटक असतात. मालाड, अंधेरी, बीकेसी, नवी मुंबई, माझगाव येथे हवेत सूक्ष्मकणांचे प्रमाण २००च्या वर असल्याने प्रदूषणाची स्थिती ‘खराब’ नोंदवण्यात आली आहे, तर याच परिसरात धूलिकणाची नोंद १००च्या आत असल्याने प्रदूषणाची नोंद ‘समाधानकारक’ नोंदवण्यात आली आहे. कुलाबा, वरळी, चेंबूर, बोरीवली, भांडुप या परिसरात हवेची स्थिती ‘चांगली’ आहे.