जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांवर हल्ला चढवणा-या अभाविपच्या दोन कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
नवी दिल्ली- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गुंडगिरीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर काही काळातच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांवर हल्ला चढवणा-या अभाविपच्या दोन कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
दरम्यान, गुरमेहर कौरला तिचे म्हणणे मांडण्याचा हक्क आहे. मी केलेली पोस्ट गंमतीने केलेली होती. त्यात तिची खिल्ली उडवण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे ट्विट करत क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने या वादातून काढता पाय घेतला. तर तुम्ही भारताचे नाही बीसीसीआचे प्रतिनिधी होता. भारताचे प्रतिनिधी अभाविपच्या गुंडगिरीविरोधात रस्त्यावर उतरले होते.
पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोर पटेल चेस्टपासून त्यांचा पाठलाग करत होते. खालसा महाविद्यालयाजवळ त्यांनी हल्ला चढवला. त्यावेळी तेथून जाणा-या पोलीस पथकाने त्यांना अडवले. ते आरोपींना घेऊन मौरीसनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
त्यांनी माझा गळा पकडून मला पट्टय़ाने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या डोळ्यावर ठोसे मारत पुन्हा दिसलास तर ठेवणार नाही, अशी धमकी दिली, असे अनुप कुमार या विद्यार्थ्यांने सांगितले.
दरम्यान, हल्ला झालेला तरुण जेएनयूचा विद्यार्थी होता. तर हल्लेखोर हे दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी होते, अशी भूमिका घेत अभाविपने कम्युनिस्ट विद्यापीठात गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून बंदोबस्त ठेवण्यात कोणतीही कुचराई झाली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सेहवागचा काढता पाय
क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. आपण फक्त विनोद म्हणून ते ट्विट केले होते, कोणाचीही थट्टा करण्याच्या हेतूने ते ट्विट केले नव्हते, असे तो म्हणाला.
‘सहमत किंवा असमहत असणं हा मुद्दाच नव्हता. तिला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणारे समाजातील अत्यंत खालच्या स्तरातील आहेत. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, मग ती गुरमेहर कौर असो अथवा फोगत भगिनी’, असे ट्विट विरेंद्र सेहवागने केले आहे.
खलिद सरसावला
दरम्यान, गुरमेहरच्या पाठिंब्यासाठी आता ‘जेएनयू’तील उमर खालिद सरसावला. सेहवाग हा बीसीसीआयसाठी खेळला, तो भारताचा प्रतिनिधी नाही, असे उमर खालिदने फेसबुक पोस्टवर म्हटले आहे. याउलट, आज दिल्ली विद्यापीठात जमलेले हजारो विद्यार्थी आणि शिक्षक हे भारताचे प्रतिनिधित्व करतात. समानता, न्याय आणि स्वातंत्र्यावर आधारित नव्या भारताचे आम्ही प्रतिनिधी आहोत, असे खालिदने या पोस्टमध्ये म्हटले आहे.