गेल्या काही महिन्यांमध्ये वस्तूंच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ आणि खुंटलेला विकास याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली- गेल्या काही महिन्यांमध्ये वस्तूंच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ आणि खुंटलेला विकास याबाबत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या भाषणात त्यांनी महागाई ही जटील समस्या बनत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील मान्सूनच्या निराशाजनक कामगिरीने महागाई नियंत्रणात अडथळा निर्माण केला आहे. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थव्यवस्थेचा चांगला विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि देशांतर्गत विविध समस्यांमुळे देशाचा विकासदर खुंटला आहे. 2011-12 मध्ये अर्थव्यवस्थेचा 6.5 टक्के विकास झाला होता. मात्र, सुधारणांसाठी भर देण्यात आल्यामुळे यंदा अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणात व्यक्त केला आहे. महागाईला आवर घालण्यासाठी सरकारकडून शक्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने महागाई नियंत्रणात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत देशात सरासरीपेक्षा 16 टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. यामुळे काही राज्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बाजारात अजूनही अन्नधान्यांच्या किमती या जास्तच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र दृष्काळग्रस्तांसाठी सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
विकासाला गतिमान करण्यासाठी विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यास सरकार कमी पडले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. विकासवाढीसाठी पूरक वातावरण निर्माण करण्याबाबत राजकीय पक्षांमध्ये उदासीनता असल्याने विकासाला मोठी बाधा निर्माण झाली असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये एकमत नसल्याने प्रमुख धोरणांची अंमलबजावणी करण्यात सरकारला अपयश आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मल्टी ब्रँड रिटेल, विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक, बँकिंग आणि निवृत्तीवेतन क्षेत्राबाबतच्या सुधारणांची योग्य प्रकारे अमलबजावणी न झाल्याने सरकारवर मोठी टीका झाली.
विविध आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी देशाचा चालू वर्षाचा विकासदर घटवला आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. तसेच आर्थिक सुधारणांबाबत सरकारमध्ये चालढकल होत असल्याने विकासाला बाधा निर्माण झाली असल्याचेही सिंग यांनी सांगितले. कामगार आणि शेतक-यांना पुरेशी सुरक्षा देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच गुंतवणूकवाढीमध्ये कुठलीही बाधा येणार नाही याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचा ओघ वाढल्यास उद्योगांमध्येही उत्साह येईल. परिणामी देशाच्या विकासामध्ये या क्षेत्राचा हातभार लागेल, असेही सिंग यांनी सांगितले. तसेच पुढच्या पाच वर्षामध्ये वीजजोडणीचा मनोदयही त्यांनी या वेळी व्यक्त केला.