सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळविण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वत:कडून मिळवायचे असते. आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला, तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वत:मध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वानाच करता येतील असे नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल, ही कल्पनाच चुकीची अहे. ‘तुझे आहे तुजपाशी। परि तू जागा चुकलासी।।’ आपण स्वत: जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे? गीतेमध्ये भगवान सांगतात की, ‘मन हे मीच आहे.’ भगवंतापासून मनाची तयारी होणार नाही. आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदासर्वकाळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येत.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज