संयुक्त राष्ट्रे – हवामान बदलासंबंधी झालेल्या पॅरिस कराराला बांधील राहण्यास कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार भारताने बुधवारी पुन्हा केला. एवढेच नव्हे, तर या कराराच्या कक्षेच्या बाहेर जाऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची भारताची तयारी आहे, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणासंबंधी झालेल्या करारावर नेत्यांच्या शिखर परिषदेत त्या बोलत होत्या. अमेरिकेने पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जून महिन्यात घेतला. भारत आणि चीनसारख्या देशांना या करारातून अधिक फायदे मिळत असल्याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्या वेळी दिले.
कार्बन उत्सर्जनात भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो. डिसेंबर २०१५ मध्ये १९० हून अधिक देशांनी मिळून पॅरिसमध्ये करार केला. जागतिक सरासरी तापमानातील वाढ रोखणे आणि ती दोन डिग्री सेल्सियसपेक्षा कमी ठेवण्याचे उद्दिष्ट या वेळी ठेवण्यात आले. सन १९९७ मध्ये झालेल्या ‘क्योटो प्रोटोकॉल’ची जागा या कराराने घेतली. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत स्वराज यांनी पॅरिस कराराच्या कक्षेबाहेर जाऊनही काम करण्याची तयारी दर्शवली; तसेच पृथ्वीसाठी असणारी आमची जबाबदारी आम्ही जाणतो, असेही सांगितले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले, हवामान बदलाचा मुद्दा भारताने गंभीरपणे घेतला आहे. भारत आणि फ्रान्स आंतरराष्ट्रीय सौर युतीवर एकत्रपणे काम करीत असल्याचेही आम्ही सांगितले आहे. स्वराज यांनी दिवसभरात मेक्सिको, नॉर्वे आणि बेल्जियमच्या नेत्यांशी द्विस्तरीय चर्चा केली. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांचीही त्यांनी भेट घेतली.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली. सॅन मॅरिनो, ब्राझील, मोरोक्को, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनाही भेटण्याचे त्यांचे नियोजन आहे.
पाकला चर्चेचे आवाहन
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी पाकिस्तानला शांतता, सुरक्षा, आणि प्रादेशिक सहकार्याच्या मुद्दय़ावर सवर्ंकष चर्चा करावी, असे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाला संबोधित करताना ते बोलत होते. ‘हिज्ब-ए-इस्लामी’बरोबर शांतता प्रस्थापित करून अफगाणिस्तानला शांतता हवी असल्याचे सिद्ध झाले आहे. शांतता, समृद्धीसाठी पाकने चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.