राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोविंद यांनी तब्बल ६५.६५ टक्के मते मिळवून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे. मीरा कुमार यांना ३५.४३ टक्के मते मिळाली. दरम्यान, २५ जुलै रोजी कोविंद हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कोविंद यांना ७ लाख, २ हजार, ६४४ तर मीरा कुमार यांना ३ लाख, ६७ हजार, ३१४ मते मिळाली आहेत. त्यामुळे मोठय़ा मताधिक्क्याने राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडून आणण्याचे रालोआचे डावपेच सफल ठरले आहेत.
नवी दिल्ली -राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान झाले होते. यावेळी ९९ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच अपेक्षेप्रमाणे कोविंद यांनी मोठी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत वाढत गेली आणि विक्रमी मताधिक्क्याने कोविंद यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. कोविंद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या गोटात आनंदाला उधाण आले आहे. दिल्ली, मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून कोविंद यांच्या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. कोविंद यांच्या १० अकबर रोड येथील तात्पुरत्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. येत्या २५ तारखेला नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आपल्या पदाच्या गोपनीयतेची शपथ घेतील. संसदेचा सेंट्रल हॉल नव्या राष्ट्रपतींचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या समारंभासाठी सेंट्रल हॉलमध्ये नवीन कार्पेट टाकण्यात आले आहे. कोविंड यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर लगेचच १० अकबर रोड या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचा समावेश असलेले भारतीय लष्कराचे खास पथक येथे तैनात करण्यात आले आहे. जोपर्यंत नवे राष्ट्रपती त्यांच्या रायसीना हिल्स येथील निवासस्थानी जात नाहीत तोपर्यंत १० अकबर रोड येथे कोविंद यांच्यासाठी तात्पुरते सचिवालयही थाटण्यात येईल. या सचिवालयातील कर्मचारी उद्या (शुक्रवार) पासूनच १० अकबर रोडवर कार्यरत असतील. याशिवाय, दिल्ली पोलिसांकडूनही या भागात विशेष सुरक्षा पुरवली जाईल.
कोविंद यांचा परिचय
कोविंद मूळचे उत्तर प्रदेशच्या कानपूरचे आहेत. कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला. रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून उत्तर प्रदेशात या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो. पेशाने वकील असलेल्या कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. कोविंद यांनी १९९१ साली भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर तीनच वर्षानी म्हणजेच १९९४ मध्ये कोविंद यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली. कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. १९९४ ते २००० आणि २००० ते २००६ हा कोविंद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ होता. पक्षाचा दलित चेहरा असलेले कोविंद पक्षाचे प्रवक्तेदेखील राहिले आहेत. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी कोविंद यांनी सांभाळली आहे. यासोबतच अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
लोकशाही मूल्यांचे संवर्धन
कोविंद यांना विविध राज्यांमधून मिळालेला पाठिंबा पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचा लाभलेला सहवास ही मला कायमच मानाची बाब वाटत आली आहे. मीरा कुमार यांचेही अभिनंदन. आपणा सर्वानाच अभिमान असलेल्या लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणारीच तुमची मोहीम होती.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
गरिबांचा प्रतिनिधी म्हणूनच राष्ट्रपती भवनात जात आहे : कोविंद
राष्ट्रपती होण्याची मला कधीच आकांक्षा नव्हती; माझे ध्येयही अर्थातच हे नव्हते. डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या दिग्गजांनी भूषवलेल्या पदावर काम करणे हे माझ्यासाठी जबादारीची जाणीव करून देणारे आहे. मी राष्ट्रपती भवनात गरिबांचा प्रतिनिधी म्हणूनच जात आहे आणि गरिबांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करणार आहे, असे रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर सांगितले. सर्वे भवंतु सुखिन: या भावाने मी देशाची सेवा करत राहीन, असेही ते म्हणाले. हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. सकाळपासून पडत असलेल्या पावसाने मला बालपणीच्या गरिबीतल्या दिवसांची आठवण करून दिली. तेव्हा आम्ही गळक्या घरात भिंतीच्या आडोशाला जाऊन पाऊस थांबण्याची वाट पाहत असू. आजही देशभरातील असे कित्येक कोविंद पावसात भिजत असतील. संध्याकाळच्या भाकरीची चिंता करत असतील. परौंख गावातील हा रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनात त्यांचाच प्रतिनिधी म्हणून जात आहे. त्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करेन, असे ते म्हणाले. आपली निवड म्हणजे प्राणामिणपणाने आपली कर्तव्य बजावणा-यांसाठी एक उदाहरण असल्याचे तसेच भारतीय लोकशाहीच्या महानतेच प्रतीक असल्याचे कोविंद यांनी सांगितले.
विचारधारा, मूल्यांची लढाई सुरूच राहील : मीरा कुमार
धर्मनिरपेक्षतेसाठी माझा लढा कायम असून, सध्या देशात दडपशाही सुरू आहे, असे वक्तव्य मीरा कुमार यांनी केले आहे. विचारधारा व मूल्यांची लढाई अशीच सुरू ठेवणार आहे. मला ज्यांनी पाठिंबा आणि मते दिली त्यांची मी आभारी आहे, असे म्हणत त्यांनी मतदारांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. निकाल लागण्यापूर्वीच मीरा कुमार यांच्या घरी पोहोचलेल्या पत्रकारांना त्यांच्या स्टाफकडून मिठाई वाटण्यात आली. ‘तुम्ही माझ्या घरी आला आहात, त्यामुळे मिठाई देणे माझे काम आहे. आम्ही निवडणुकीची निष्ठा पाळली, निवडणुकीसाठी कोणतीही मर्यादा आम्ही ओलांडली नाही. हे गुप्त मतदान आहे. सर्वाना मतदान करण्याचा अधिकार आहे, त्याबाबत मी काहीही टीप्पणी करू इच्छित नाही’ असे मीरा कुमार म्हणाल्या.
महाराष्ट्रातील २२ मते फुटली!
महाराष्ट्रातील मतदानाचा विचार करता विरोधकांची किमान २२ मते फुटल्याचे दिसून येते. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान २२ सदस्यांनी मीरा कुमार यांना मतदान न करता सत्ताधारी रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे दिसते आहे. आता ही मते काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची? अशी कुजबुज सुरू झाली आहे. या निवडणुकीत एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केले. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे परदेशात असल्याने त्यांनी मतदान केले नव्हते. महाराष्ट्रातील २८७ आमदारांच्या मतांपैकी २०८ मते कोविंद यांना, तर ७७ मते मीरा कुमार यांच्या पारडय़ात पडली. महाराष्ट्रातील २ मते बाद ठरली. भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांची मिळून १८६ मते होतात. मात्र, कोविंद यांना २०८ मते पडली.