राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये पाकने अंदाधुंद गोळीबार केला असून या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले असून तीनजण गंभीर जखमी आहेत.
श्रीनगर- पाकिस्तानने सलग तिस-यादिवशीही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये पाकने अंदाधुंद गोळीबार केला असून या गोळीबारात दोन भारतीय नागरिक ठार झाले असून तीनजण गंभीर जखमी आहेत. गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्याचे कामही थांबवण्यात आले आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात मोर्टारचा मारा केल्यामुळे दोन भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर तीनजणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारामुळे सीमा भागातील नौशेरा, किला दरहल आणि मंजाकोट इथल्या गावांमधील शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
पाक सैन्य गेल्या तीन दिवसांपासून सतत गोळीबार करत आहेत. भारतीय जवानही पाकला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण यात सीमा भागात राहणा-या गावक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.