आता अंत न पाहता शेतक-यांना कर्जमाफी द्या. त्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर कर्ज रोखे काढा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई- आता अंत न पाहता शेतक-यांना कर्जमाफी द्या. त्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर कर्ज रोखे काढा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.
शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची माहिती देण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी पवार म्हणाले की, आतापर्यंत अनेक योजना महाराष्ट्राने इतर राज्यांना दिल्या. आजही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवारसह इतर पॅटर्न मागवले.
मात्र आमचे मुख्यमंत्री कर्जमाफी करण्यासाठी उत्तर प्रदेशने काय केले याचा अभ्यास आम्ही करतोय, असं मुख्यमंत्री म्हणतात. इतरांचे कसले अभ्यास करता, तुमच्याकडे पैस नसतील तर कर्जरोखे काढा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
संपूर्ण कर्जमाफी द्या – पृथ्वीराज चव्हाण
कर्जमाफीसाठी राज्याला ३० हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दिली आहे. युपीच्या शेतक-यांप्रमाणे एक लाखापर्यंत दिलेली कर्जमाफी आम्ही स्वीकारत नाही. महाराष्ट्रातील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.