मराठी बालसाहित्यात स्वतंत्र साहित्यकृतींची संख्या तशी मर्यादित आहे. त्यातही स्वतंत्र अभ्यास करून लिहिलेल्या कथा-कादंबरिका यांची अगदीच वानवा आहे. या सा-या पार्श्वभूमीवर काहीसं आशावादी वाटावं असं एक पुस्तक वाचनात आलं.
हे पुस्तक लिहिलयं ते देखील शिक्षक, प्राध्यापक किंवा बालसाहित्यिक मंडळीपैकी कोणी नसलेल्या एका व्यक्तीनं. सलीम सरदार मुल्ला. पेशाने वनरक्षक असलेल्या माणसानं! अशा क्षेत्रातल्या, त्यातही अभ्यासू वृत्तीनं लिहिलेल्या या पुस्तकाचं नाव आहे, ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही एक एकावन्न पानांची किशोर कादंबरिका आहे.
गुळगुळीत आर्ट पेपरवर कृष्णधवल रंगात छापलेलं हे पुस्तक आकर्षक तर आहेच. पण चित्रकार देखील नवखा वाटावा असाच असूनही त्याच्या चित्रांनी पुस्तकाला चांगला न्याय दिलाय. लेखक आणि चित्रकार ही नवीन मंडळी एक छान कादंबरिका मराठी बालसाहित्यात घेऊन आलेत हे नक्की.
या पुस्तकात किशोरवयीन मुलांचं एक ‘फुलपाखरू मंडळ’ आहे. त्यात जेबू, बारकू, ऋतुजा, शामू, दादू, धीरज अशी जी मुलं आहेत, या सा-यांना पक्षी निरीक्षणाचा छंद आहे. त्यासोबत जंगलात फेरफटका मारण्याचा छंद आहे. मात्र इथं कथेला पूरक वापरतात तसं जंगल नाही. केवळ वर्णन नाही. तर वास्तव जंगलात वावरणारी ही मुलं आहेत. त्यामुळेच तर वास्तवाचा आधार हे या पुस्तकाचं वेगळेपण आहे. या मुलांकडं छोटी दुर्बीण जशी आहे तशी नोंदवहीसुध्दा आहे.
पाहिलेल्या पक्ष्यांच्या नोंदी लिहिणं घरी जाऊन पुस्तकात कोशामध्ये त्याचं नाव शोधणं, त्याची माहिती मिळवणं असं अभ्यासू काम ही मुलं करत असतात. बुलबुल, मैना, शिंप्या, शिंजिर अशा फुलांवर येणा-या पक्ष्यांना न्याहाळण्यापासून त्यांची सुरुवात होते.वाटेत पळस, पांगारा, ऐन, किंजळ, असे विविध वृक्ष पाहत ही मुलं जंगलात जातात. जंगलाची सैर करायला जातानाच्या सर्व वस्तू, सॅक, पाणी, ग्लुकोज, नोंदवही, दुर्बीण ही सर्व सामग्री त्यांच्यासोबत असते. हं आणखी एक म्हणजे ‘शेरू’ नावाचा कुत्रा.
लहानपणीच बिबटयाच्या तावडीतून सुटलेल्या या पिल्लाची साथ पण या सर्व मित्रांना मिळते. त्यामुळे सर्वानाच मोठा आधार वाटतो. सुतळ म्हणजे वाम मासा, खरब्या, बेचक्या अशा माशांचे प्रकारही या मंडळींना पाहायला मिळतात. तर वडाची फळे खाणारा तांबट पक्षी त्या दिवशी त्यांना पाहायला मिळतो. बारकूच्या आजोबांचं जंगलात असलेलं छोटसं घर तेथील शेरू कुत्रा पाहून तर मुलांना खूपच आनंद मिळतो. त्यांच्या घरच्या गूळ-पाण्यानं तर सर्वाचा थकवाही निघून जातो. तर गार वारा, रायवळ आंब्याच्या मोहराचा गंधही त्यांना आवडतो.
डोंगर उताराला नाचणीचं पीक घेतलं तेव्हा गवे, रानडुक्करं, सांबरं, पण इथं येतात हे ऐकून तर मुलांना अप्रूपच वाटतं. शामूला तर गवारेडा म्हणताच भीती पण वाटते. बिबटयाचा सुद्धा या भागात वावर असल्याची माहिती मिळताच सर्व जण घाबरतात. पण आपल्या जंगलातल्या या सा-या मौलिक गोष्टींनी त्यांच्या ओळखीची त्यांच्या ज्ञानात भरही पडते. एक नवं जग, नवी ओळख सर्वाना सुखावून जाते. असंच जंगलातून फिरताना त्यांना कमरेला कोयती अडकलेला एक मजूर दिसतो. त्याच्यासोबत चांगले कपडे घातलेला एक धिप्पाड मनुष्य सुद्धा.
मुलांना शंका येते. तो कंत्राटदार असल्याचं दादू सांगतो. मग हे इकडे का? असा प्रश्नही मुलांना पडतो. जंगलातल्या औषधी वनस्पती कंदमुळं यांची ते तस्करी करतात. हे मुलं शोधून काढतात. त्यांचा सर्व साठा मुलं पकडून देतात. जंगलाच्या जवळील गावात असणा-या वनसंरक्षण समितीच्या सहाय्यानं हे सारं काम फत्ते होतं. या कामगिरीबद्दल रेंजर मुलांचं कौतुक करतात असं कथानक असणारी ही कादंबरिका.
सलीम मुल्ला स्वत: वनरक्षक असल्यामुळे प्राणी, पक्षी, झाडं, वेली, जलचर प्राणी, कीटक या सर्वाची इत्थंभूत माहिती देतात. या कादंबरीच्या अखेरीला वनस्पती, पक्षी यांच्या शास्त्रीय नावांची यादीही जोडली आहे. एकदाच ही कांदबरिका एका वेगळया वास्तवाचं चित्रण करणारी आहे. इथं मुलांचं साहस आहे. निसर्गाचा खजिना जपतानाच त्यात तस्करी करणा-यांशी मुलं कसा सामना करतात याचं प्रत्ययकारी चित्रण आहे. मुलांना नवं सांगणारी ही छान कादंबरिका आहे. दर्या प्रकाशनाचं हे पुस्तक म्हणूनच वाचायला पाहिजे.