तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या सिंहासनासाठी संघर्ष सुरू झाला आहे.
चेन्नई- तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या सिंहासनासाठी संघर्ष सुरू झाला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि जयललितांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला यांच्यात हा संघर्ष सुरू आहे. दोघांनीही आपापले बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदार, खासदार यांची जमवाजमव सुरू केली असून दिवसागणिक ही स्पर्धा तीव्र होत चालली आहे.
या स्पध्रेत रविवारी पन्नीरसेल्वम यांच्या गटात पक्षाचे ५ खासदार सामील झाले. त्यामुळे त्यांना पाठिंबा असलेल्या खासदारांची संख्या १० वर गेली आहे. दुसरीकडे शशिकला यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होऊनही त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव हे टाळाटाळ करत असून यामागे शशिकलांविरोधात येत्या काही दिवसांत लागणारा बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाचा निकाल, हे कारण असल्याचे बोलले जात आहे.
तर पन्नीरसेल्वम यांनी मात्र शशिकलांविरोधात आरोपांची राळ उठवली असून दररोज ते त्यांच्यावर नवनवे आरोप करत आहेत. यामुळे पन्नीरसेल्वम यांना एआयडीएमकेचे नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.