आपल्या महाराष्ट्रात कोणतंही एक सर्वोच्च तीर्थक्षेत्रं सांगा असं म्हटलं तर कोणत्याही एका तीर्थक्षेत्राचं नाव घेता येणार नाही. कारण भाविकांच्या दृष्टीने सगळेच श्रेष्ठ असतात. कारण प्रत्येक लहान-मोठया क्षेत्राविषयी प्रत्येकाचा विश्वास असतो.
मात्र मध्य प्रदेशातील उज्जन याला अपवाद म्हणता येईल. तुमच्यापैकी कोणी उज्जन पाहिलं असेल त्याला याची प्रचिती येईल. स्कंदपुराणातील ‘अवन्ती’ खंडातही उज्जनविषयी किंवा त्याच्या विस्ताराविषयी बरीच माहिती आहे.
असं हे क्षेत्रं विस्तीर्ण असून त्यात गंधवती, नवनदी आणि नीलगंगा या नद्या वाहतात. महाकालेश्वर महाकालची प्रागैतिहासिक प्राणप्रतिष्ठा याच ठिकाणी केली गेली. असं म्हणतात की, महाप्रलयानंतर मानवी सृष्टीचा आरंभ याच पावन भू-भागापासून झाला होता. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार या वाक्याला पुष्टी मिळाली आहे. कालौघात ही पावन भूमी ‘मानव जननी’ म्हणूनही ओळखली जाऊ लागली.
इथल्या महाकाल तीर्थक्षेत्राची महानता केदारनाथ आणि बनारस (काशी) या दोन तीर्थक्षेत्रांपेही अधिक मानली जाते. अत्यंत पुण्यमय भूमी, अद्भूत, अलौकिक शांतता आणि मनोवांच्छीत फळ देणारी अशी ही भूमी असून हिच्याशिवाय अन्य कोणतंही ठिकाण पृथ्वीवर नाही, असं समजलं जातं.
महाप्रलयानंतर सर्वप्रथम हेच शहर मानवनिर्मितीनं समृद्ध झालं होतं. याच भूभागात बारावं ज्योतिर्लिग महाकालेश्वरची स्थापना झाली. उज्जनच्या महाकालेश्वराच्या मंदिरासमोर कलहनाशन नावाचं कुंड आहे, या कुंडात स्नान केल्यावर म्हणे मानव सगळ्या त्रासातून मुक्त होतो. या तीर्थाच्या दक्षिणेस प्रस्थमातृका मंदिर आहे. त्याच्यासमोर श्रेष्ठ शंकर तीर्थामधलं मणिकर्णिका कुंड आहे.
महाकालवनचं दुसरं नाव अप्सरा तीर्थ असंही संबोधलं जातं. कारण या भूभागावर उर्वशी अप्सरेने राजा पुरुरवाला मोहीत करून पती बनवलं होतं. म्हणून या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत. प्रस्थमातृका मंदिराच्या दक्षिणेस महाकाल तीर्थ रूप म्हणून ओळखलं जातं, तिथेच पुढे महिष कुंड असून ते पवित्र जल आहे. या कुंडास रुद्र सरोवर असंही म्हटलं जातं.
याच ठिकाणी गांगती नावाची गुफादेखील आहे. या गुफेच्या उत्तरेला विद्याधर नावाचं तीर्थ आहे. तसंच शीतलामातेच्या प्रार्थनेसाठी मर्कटेश्वर मंदिरही आहे. इथल्या स्वर्ग तीर्थ नामक तीर्थात भैरव आणि भवानी एकत्र पूजा करायचे असं म्हटलं जातं. उज्जनच्या राजस्थळी शिवमूर्ती असून त्या ठिकाणी चार समुद्र एकत्र सापडण्याची शक्यता वर्तवली जाते.
त्यानंतर तिथे शंकरवापिका नावाचं ठिकाण आहे, जिथे शंकर आणि सूर्याची प्रतिमा दिसते, तिथेच असलेली गंधावती नदी ही पिंडदान स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दशाश्वमेशिका तीर्थात स्थान केलं जातं आणि तिथे शिवलिंगाची काळी प्रतिमा आहे. या उज्जनमध्ये एकानाशा नावाची देवी असून तिला दारू आणि मांसाचा भोग चढवला जातो.
हरिसिद्धी देवी ही उज्जनची आणखी एक देवी आहे जिला अश्विन महिन्यात नववीच्या दिवशी मांसाहारी भोग चढवला जातो. जवळच पिशाचतीर्थदेखील आहे. डुण्डेश्वर नामक महादेवाचं मंदिरही याच ठिकाणी आहे. इथल्या क्षिप्रा नदीत स्नान करणं म्हणजे अश्वमेघ यज्ञाचं पुण्य मिळाल्याचं समजलं जातं.
शिवाचं डमरूवादन सर्वानाच परिचीत आहे. अशा या डमरूवादनाची आठवण करून देणारं डमरुकेश्वर मंदिर या ठिकाणी असून या मंदिराला वेगळीच शोभा आहे. याशिवाय अनादिकल्पेश्वर, वीरभद्र, चंद्रिका, सिद्धेश्वर, स्वर्ण जालेश्वर, कर्कटेश्वर, महामायादेवी आणि कपालेश्वर मंदिर आहेत.
मर्यादा पुरुषोत्तम रामाने रामेश्वरला शिवलिंगाची स्थापना केली होती. त्याचे भक्त हनुमान याच्याद्वारा स्थापित शिवलिंग म्हणजे हनुमतकेश्वर शिवलिंग होय. रुद्र सरोवराच्या बाजूला कोटेश्वर तीर्थ आहे. यात स्नान केल्यावर महाकालची पूजा केली जाते.
कपालमोचन शिवलिंगाची पूजा केल्यावर हनुमतकेश्वरला जाता येतं. तिथे असलेल्या महादेवाच्या पिंपळमूर्तीचं दर्शन केल्यावर स्वप्नेश्वरचं दर्शन होतं. याचबरोबर विश्वतोभिमुख ईशान, कोड रोग नष्ट करणारा सोमेश्वर, वैश्वनरेश्वर नकुलोश गधानेश्वर, महाकाल विघ्नशा, दण्डपीणतीर्थ, पुष्पदंततीर्थ, गृहय़महाकाल क्षेत्र, दुंबबागेश्वर, गौरीतीर्थ, चामेश्वर, विदिशा, मात्रेश्वर आदी मंदिरं उज्जनमध्ये आहेत.
असं म्हणतात, महर्षि वाल्मिकीने याच अवन्ती ठिकाणी वाल्मिकी रामायण पूर्ण करून महर्षि झाले. त्याचप्रमाणे शुक्रेश्वर, भौमेश्वर आणि लंकेश्वरचाही या ठिकाणी वास होता. या क्षेत्राच्या पूर्वेला पिंगलेश्वर, पश्चिमेला विश्वेश, उत्तरेला उत्तरेश्वर आणि दक्षिणेला कायावरोहण मंदिर होते. याठिकाणी भेट देणं म्हणजे विश्वप्रदक्षिणा केल्यासारखंच असतं.
दुर्गापूजेतही उज्जन मागे नाही. हरसिद्धी देवीबरोबरच, पद्मावती, स्वणर्भ श्रृंगातिका, अमरावती, उज्जयिनी, विशालादेवी आदी देवींची पूजा केली जाते. प्राचीन आख्यानात इथल्या उज्जयिनी नामक एका कुंडाचाही उल्लेख सापडतो. जिच्या बाजूला मंदाकिनी नावाची नदी वाहते.
क्षाता आणि क्षिप्रा या दोन नद्यांचा संगमदेखील पाहण्यासारखा आहे. अशा या देवीदेवतांची भूमी असलेल्या उज्जनचा सिंहस्थदरम्यान धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक वाढतं. साधुसंतांची गर्दी, सर्वत्र मंत्रोच्चार यामुळे एक प्रकारचं प्रसन्न आणि पवित्र वातावरण असतं.