भविष्यात युद्धेही रणांगणाऐवजी सायबर विश्वात लढली जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.
नवी दिल्ली- भविष्यात युद्धेही रणांगणाऐवजी सायबर विश्वात लढली जातील, अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. त्यामुळे सायबर हल्ल्यांपासून आपले संरक्षण करण्याची क्षमता वाढीस लागणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पर्रिकर म्हणाले की, जगातील धुमाकूळ घालणारी ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना इंटरनेट तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करत आहे. या माध्यमातून ते आपला प्रचार व प्रसार करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर भारताचे वर्चस्व हळूहळू वाढत आहे. त्यामुळे लष्कराचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. यात माहिती-तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. कारण भविष्यातील युद्धे ही सायबर युद्धे असतील.
मात्र, जमिनीवर युद्ध करणा-या लष्कराला पर्याय नाही. पण त्यांना लढाईसाठी अधिकाधिक माहिती पुरवणे गरजेचे ठरेल. त्यातही माहितीचा भ्रष्टाचार ही मोठी समस्या उभी राहील. कारण माहिती-तंत्रज्ञानामुळे तुम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती तात्काळ मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय लष्कराने केवळ डिजिटल प्रगतीवर विसंबून राहू नये. तर सायबर हल्लेखोरांकडून होणा-या संभावित हल्ल्यापासून बचाव करणे गरजेचे आहे. भारत हा सॉफ्टवेअर तयार करण्यात अग्रेसर आहे. मात्र, हार्डवेअर डिझायनिंग आणि एकात्मिक यंत्रणा तयार करण्यात भारताने आघाडी घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
संरक्षण दले अधिकाधिक अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम एकाच रात्रीत होणार नाही. ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पाअंतर्गत संरक्षण सामग्री देशांतर्गत तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.