सनातन संस्थेवर राज्यभरात ताबडतोब बंदी घालण्याची मागणी बुधवारी भाजपचे आमदार विष्णू वाघ यांनी केली आहे.
पणजी- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सध्या टार्गेट असलेल्या सनातन संस्थेवर राज्यभरात ताबडतोब बंदी घालण्याची मागणी बुधवारी भाजपचे आमदार विष्णू वाघ यांच्यासह गोवा काँग्रेस तसेच सीपीआयएम(गोवा) या पक्षांनीही केली आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. मात्र विचार न पटणा-यांचे तोंड बंद करण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब करणे हा यावर उपाय नाही, असे मत आमदार वाघ यांनी बोलताना व्यक्त केले.
गोव्यात मुख्यालय असलेल्या आणि यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या सनातन संस्थेवर राज्य सरकारने बंदी घालणे योग्य ठरेल, असा दावा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान राज्यातील भाजपा सरकारने श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकांवर १४ जानेवारी, २०१६ पर्यंत बंदी घातली आहे. तशीच कठोर कारवाई सनातन संस्थेवर होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.