राजस्थान रॉयल्सने रविवारी रात्री मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या दुस-या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४ धावांनी सहज विजय मिळवला.
मुंबई – सलामीवीर अजिंक्य रहाणे ( नाबाद ९१) आणि करुण नायर (६१) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रविवारी रात्री मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या दुस-या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४ धावांनी सहज विजय मिळवला.
या कामगिरीसह राजस्थानचा संघ पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतला आहे. आयपीएलच्या आठव्या पर्वात सलग पाच विजय मिळवून दमदार सुरुवात करणा-या राजस्थानची कामगिरी ढेपाळली होती. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सची गाडी रुळावर आली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार जे.पी.डयुमिनीचा निर्णय दिल्लीच्या गोलंदाजांनी चूकीचा ठरवला. सलामीवर अजिंक्य रहाणे आणि करुण नायरने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत खो-याने धावा लुटल्या. दोघांनी दुस-या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचली.
या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थानने निर्धारीत वीस षटकात १८९ धावांचा डोंगर उभारला. त्याआधी राजस्थानचा कर्णधार शेन वॉटसन (२१) आणि रहाणेने ५२ धावांची दमदार सलामी दिली.
दिल्लीला फक्त वॉटसन आणि नायर या दोन फलंदाजांना बाद करता आले. १९० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. फॉर्ममध्ये असलेला श्रेयस अय्यर फक्त (९) धावांवर तंबूत परतला. मयांक अग्रवालही फारशी चमक दाखवू शकला नाही. (११) धावांवर स्टुअर्ट बिन्नीने त्याच्या यष्टया वाकवल्या.
दिल्लीकडून फक्त कर्णधार डयुमिनीने (५६) धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचा अपवाद वगळता दिल्लीचा अन्य कुठलाही फलंदाज विजयासाठी आवश्यक असलेली मोठी खेळी करु शकला नाही. युवराज सिंग (२२) धावा काढून बाद झाला. फॉकनरने त्याला बिन्नीकरवी झेलबाद केले. दिल्लीने वीस षटकात सात गडी बाद १७५ धावा केल्या.
‘मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर झोप लागली नव्हती’
मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर त्या रात्री झोप लागली नाही, असे राजस्थानचा हुकमी सलामीवीर अजिंक्यने सांगितले. चुकीचा फटका पराभवाला कारणीभूत ठरला, असे त्याचे म्हणणे आहे. ‘‘मुंबईविरुद्धचे बाद होणे, मला आवडले नाही. १६ धावांवर असताना प्रतिस्पर्धी गोलंदाज आर. विनय कुमारच्या गोलंदाजीवर चुकीच्या पद्धतीने फटका मारला. सुरुवातीची षटके खेळल्यानंतर संपूर्ण षटके खेळून काढण्याचा माझा विचार होता. मात्र चुकीच्या फटक्याने गणित बिघडवले. माझा फटका पराभवासाठी कारणीभूत ठरला, असे मला वाटते. त्यामुळे त्या रात्री मला झोप लागली नाही,’’ असे रहाणेने म्हटले. दिल्लीविरुद्ध शतक हुकल्याचे दु:ख नसल्याचे अजिंक्यने म्हटले. ‘‘रविवारी शतकाचा विचार मी केला नव्हता. शेवटच्या षटकात अधिकाधिक धावा करण्याचे माझे लक्ष्य होते. संघाला १९५ धावांपर्यंत पोहोचवण्याचा माझा विचार होता,’’ असे त्याने सांगितले.