महाराष्ट्र शासन आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील मोठया बंदरांचा विकास केला जाणार आहे.
रत्नागिरी- महाराष्ट्र शासन आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील मोठया बंदरांचा विकास केला जाणार आहे. येत्या चार वर्षापर्यंत बंदरांची क्षमता दहा पटीने वाढवून २०० मिलियन मेट्रिक टनापर्यंत नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास मेरिटाईम बोर्डाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ते म्हणाले, बंदरे रेल्वेशी जोडण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. जयगड बंदर कोकण रेल्वेशी जोडले जात आहे. जिंदल कंपनी, कोकण रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला असून, पालघर-डहाणू बंदरही रेल्वेशी जोडण्यात येणार आहे.
छोटी बंदरे विकसित होत आहेत. परंतु, मोठया बंदरांचा विकास हा खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शासन आणि खासगी कंपनी एकत्रित येऊन बंदर विकासाला चालना देण्याचे काम करत आहे.
कोकणातील विजयदुर्ग, रेवस, दिघी आदी बंदरांच्या विकासाकडे लक्ष दिले जात आहे. खासगीकरणातून बंदरे विकसित करत असताना या बंदरांची क्षमता येत्या चार वर्षापर्यंत दहा पटीने वाढवली जाणार आहे. जवळजवळ २०० मिलियन टनापर्यंत ही क्षमता वाढवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही चॅटर्जी यांनी यावेळी सांगितले.