केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाचा राज्यसभेतील मंजूरीचा मार्ग खडतर असल्याने, भाजपा सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि समाजसेवक अण्णा हजारे यांना विधेयकावर खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाचा राज्यसभेतील मंजूरीचा मार्ग खडतर असल्याने, भाजपा सरकारने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि समाजसेवक अण्णा हजारे यांना विधेयकावर खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
भाजपाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोनिया गांधी आणि अण्णा हजारे यांना पत्र लिहून भूसंपादन विधेयकावर खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
नरेंद्र मोदी सरकारचे भूसंपादन विधेयक उद्योजकांच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी आहे. काँग्रेस प्रणीत संपुआ सरकारने शेतक-यांचे हित डोळयासमोर ठेऊन केलेल्या अनेक तरतुदी नव्या विधेयकातून काढून टाकण्यात आल्या आहेत.
त्यामुळे काँग्रेसची सभागृहाच्या आत संसदीय मार्गाने आणि रस्त्यावर आंदोलने सुरु आहेत. नवे भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचे असून, विधेयकाच्या सर्व अंगांवर चर्चा करण्याची सरकारची इच्छा आहे असे गडकरी यांनी सोनिया गांधी आणि अण्णा हजारेंच्या लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
आठवडयाच्या सुरुवातीला सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकत्र येऊन विधेयकाच्या विरोधात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपवले होते.