बिहार विधानसभेच्या पोटनिवडणुकीत १० जागांसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी निरुत्साह दाखवला. दिवसभरात बिहारमध्ये केवळ ४६.४२ टक्के मतदान झाले.
पाटणा- बिहार विधानसभेच्या पोटनिवडणुकीत १० जागांसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी निरुत्साह दाखवला. दिवसभरात बिहारमध्ये केवळ ४६.४२ टक्के मतदान झाले. बिहारसह कर्नाटक, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्येही विधानसभेसाठी पोटनिवडणूकीचे मतदान शांततेत पार पडले. कर्नाटकमध्ये सर्वाधिक ७२ टक्के तर बिहारमध्ये सर्वात कमी ४६,४२ टक्के मतदान झाले. या सर्व जागांवरील उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्याने येथे पोटनिवडणूक पार पडली.
बिहारमधील नरकटियागंज येथे सर्वाधिक ५८ टक्के मतदान झाले तर भागलपूर मतदार संघात सर्वात कमी ३७ टक्के मतदानाची नोंद झाली. पूरग्रस्त भागात निवडणूक आयोगातर्फे मतदानासाठी बोटींची व्यवस्था करण्यात आली होती.
बिहारमधील हाजीपूर, छाप्रा, मोहिद्दीनगर, परबत्ता, भागलपूर, राजनगर, जाले, मोहनिया, नरकाटीयागंज आणि बंका या दहा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक झाली. १० जागांसाठी ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये पाच महिलांचा समावेश होता. हाजीपूरमध्ये सर्वाधिक १५ उमेदवार तर बंका आणि राजनगर येथे प्रत्येकी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
बिहारमध्ये एकेकाळी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणा-या जेडीयू व राजेडी यांना आता काँग्रेसचीही साथ मिळाली आहे. राज्यात भाजपचा पराभव करण्यासाठी जेडीयू-आरजेडी-काँग्रेस एकत्र आले आहेत. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जेडीयू व आरजेडी प्रत्येकी चार जागा तर काँग्रेस दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहे.