लोकसभा निवडणुकीचे अंतिम टप्प्याचे मतदान संपताच विविध सर्वेक्षण करणा-या संस्थांनी आपले ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचे अंतिम टप्प्याचे मतदान संपताच विविध सर्वेक्षण करणा-या संस्थांनी आपले ‘एक्झिट पोल’चे निष्कर्ष जाहीर केले आहेत. ‘आज तक-सिसरो’ने एनडीएला २७२, यूपीएला ११५ तर अन्य पक्षांना १५६ मिळतील, असे सांगितले. इंडिया टीव्ही-सी व्होटरच्या सर्वेक्षणात एनडीएला २८९ जागा, कॉँग्रेसला १०१, ‘आप’ला ५ आणि अन्य पक्षांना १४८ मिळतील, असे भाकित केले. तसेच ‘टाइम्स नाऊ’ने केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला २४९, यूपीएला १४८ तर अन्य पक्षांना १४६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
एपीबी न्यूज आणि एसी नेल्सनने केलेल्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात भाजपला ४६ जागा, कॉँग्रेसला ८, सपाला १२ तर बसपाला १३ जागा मिळतील, असे जाहीर केले आहे. ‘आज तक’ने केलेल्या सर्वेक्षणात एनडीएला २७२ ते २८३ जागा, यूपीएला ११० ते १२० जागा मिळण्याचे भाकित वर्तवले आहे. दिल्लीतील सहाही लोकसभेच्या जागा भाजपला मिळतील, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे.
‘एक्झिट पोल’पासून कॉँग्रेस दूर
‘एक्झिट पोल’पासून दूर राहण्याचा निर्णय कॉँग्रेस पक्षाने घेतला आहे. ‘एक्झिट पोल’बाबत वृत्तवाहिनीवर होणा-या चर्चेत कॉँग्रेस सहभागी होत नाही, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते शकील अहमद यांनी दिली. गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये कॉँग्रेसला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त होता. मात्र प्रत्यक्षात कॉँग्रेसचा विजय झाला होता, याची आठवण अहमद यांनी करून दिली.