लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ पत्रकार परिषदेत करणार आहेत.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ पत्रकार परिषदेत करणार आहेत. या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता लागू होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन निवडणूक आयुक्त पत्रकार परिषदेत देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या दुस-या आठवड्यात मतदानाची प्रक्रिया सुरु होईल. तसेच सहा टप्प्यात संपूर्ण देशातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीमध्ये तब्बल ८१ कोटी जनता मतदानाचा हक्क बजावू शकतील. याआधी २००९मध्ये सहा टप्प्यात १६ एप्रिल ते १३ मे या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या.
सध्याच्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने नवी लोकसभा एक जून रोजी अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
या लोकसभा निवडणूकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषाण केली जाईल. तसेच देशातील नक्षलग्रस्त असलेल्या ३५ जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत प्रथमच मतदारांना मतदान केल्याची पावती मिळणार आहे. देशातील काही मतदान केंद्रामध्ये प्रायोगीक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार आहे.