ए. के. गांगुली आणि तेलंगणा प्रकरणावरुन झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
नवी दिल्ली – शिकाऊ महिला वकीलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी असलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. गांगुली यांना पश्चिम बंगालच्या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदावरुन काढण्यात यावे तसेच तेलंगणा प्रकरणावरुन झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
दिवसाच्या सुरुवातीला काँग्रेस , वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने तेलंगणा विभाजनासाठी विरोध करणारे पत्रक जाहीर केले. त्याचबरोबर समाजवादी पक्षाने चीनी आक्रमण रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी केली. या सर्व पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले.
दुपारनंतर लोकसभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र कामकाज सुरु होताच सुदिप बंडोपाध्याय याच्यासोबतच तृणामूलच्या सदस्यांनी ए के गांगुली यांचे अध्यक्षपद काढून घेण्यात यावे यासाठी मागणी सुरु केली. काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने तेलंगणा विभाजनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
लोकशाही वाचवा, तेलंगणाचे विभाजन करु नका अशा घोषणा दिल्या. द्रमुकच्या सदस्यांनीही श्रीलंकन नौसेनेकडून भारतीय मच्छिमांरावर होत असलेल्या हल्ल्याबाबत आंदोलन चालूच ठेवले.मंत्र्यांच्या या गदारोळामुळे लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी अखेर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.