लातूरमध्ये घंटागाडी येत नसल्याने व्यावसायिकांनी कचरा रस्ता दुभाजकांत टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे रस्ता दुभाजकांचे आता कचराकुंडय़ांत रूपांतर झाले आहे.
लातूर – कचरामुक्त शहर निर्माण करण्याच्या संकल्पनेतून शहरातील सर्वच कचरा-कुंड्या काढण्यात आल्या. कचरा आपापल्या दुकानांत साठवून अक्षय घंटागाडी येईल तेव्हा कचरा गाडीत टाकण्याची पद्धत होती. मात्र अक्षय घंटागाडीच येत नसल्याने व्यावसायिकांनी कचरा रस्ता दुभाजकांत टाकणे सुरू केले आहे. त्यामुळे रस्ता दुभाजकांचे आता कचराकुंडय़ांत रूपांतर झाले आहे. या कचमुळे रस्ता दुभाजकांतील शोभेची झाडे कुजून नामशेष होत आहेत. त्यामुळे कचरा रस्त्यावर येत असून त्याचा वाहनधारकांसह सर्वानाच त्रास होतो आहे.
प्रक्रियेतील विलंब अन् कचराच कचरा
शहरातील गोळा झालेला कचरा उचलून कचरा खत कारखान्याच्या जागेत नेऊन टाकण्याचे काम देण्यासाठी महानगरपालिका अनेक दिवसांपासून प्रयत्नांत आहे. मात्र या कामाच्या निविदा भरण्याचे आणि त्या उघडून काम देण्याच्या प्रक्रियेला बराच विलंब होत असल्याने शहरातील कचरा वाढतच चालला आहे. या निविदा भरण्यासाठी ११ सप्टेंबर २०१२ ही शेवटची तारीख होती. चार संस्थांनी निविदांचे अर्ज नेले होते मात्र किती जणांनी निविदा भरल्या. त्याचे पुढे काय झाले? या गोष्टी अद्यापही लखोटा बंदच आहेत. मनपाने कचरा उचलण्याच्या कामाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.
डासांचा उपद्रव वाढला
शहरातील सर्वच रस्त्यांची व गटारांची साफसफाई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून होत होती. आजही होत आहे. मात्र मनपा कर्मचाऱ्यांनी गोळा केलेला कचरा अक्षय घंटागाडीच्या माध्यमातून उचलला जात होता. अक्षय घंटागाडीचा करार संपला. त्यानंतर शहराच्या मुख्य रस्त्यांसह कोणत्याही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा बरेच दिवस एकाच जागेवर पडून राहिल्याने कचरा कुजून दरुगधी पसरली आहे. तसेच डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात होत आहे.