आझाद मैदानातील सभेत राज ठाकरे यांनी अबू आझमी आणि रिपाईच्या नेत्यांवर ताशेरे ओढले होते. बुधवारी प्रकाश आंबेडकर, अबू आझमी यांनी राज यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले.मुंबई – आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन करताना राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांचा प्रकाश आंबेडकर, अबू आझमी आणि रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला. आमच्यावर टीका करण्यापूर्वी तुमचे चारित्र्य तपासा. आम्हाला पोलखोल करायला लावू नका, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला, तर मला मतदान करणारे एक लाख बांगलादेशी दाखवा आणि दोन कोटी रुपये घेऊन जा, असे आव्हान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दिले. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही राज यांच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
आझाद मैदान येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आंबेडकर, आझमी आणि रामदास आठवले यांच्यावर टीका केली होती. त्याचे पडसाद बुधवारी उमटले. ‘‘उत्तर प्रदेशात लखनौ, कानपूर किंवा अन्य कोणत्याच ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती फुटल्याचे आपणास ज्ञात नाही. परंतु तालिबानमध्ये बुद्धमूर्ती फोडल्या गेल्या तेव्हा राज ठाकरेंचे बुद्धप्रेम कुठे गेले होते,’’ असा सवाल आंबेडकर यांनी केला. आमच्या वाटेला जाऊ नका. प्रथम तुमचे चारित्र्य तपासून पाहा. आम्हाला पोलखोल करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही आंबेडकरांनी दिला.