हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन बस गाडल्या गेल्या असून, बसमधील ६० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन बस गाडल्या गेल्या असून, बसमधील ६० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ढिगा-याखाली अनेक वाहने अडकलेली असून विशेष पथकाद्वारे मदतकार्य सुरू आहे. भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या बसपैकी एक बस चंबा येथून मनाली येथे जात होती. तर दुसरी मनाली येथून कटरा येथे जात होती. या बस मंडी येथे आल्या असताना हा अपघात झाला.
हिमाचल प्रदेशमधील मंडी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भूस्खलन झाले. ज्यामध्ये २ बस अडकल्या असून, एक बस आठशे मीटपर्यंत वाहून गेली आहे, शिवाय अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले. या घटनेतील पाचजणांना वाचवण्याच यश आले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलनात अडकलेल्या दोन्ही बस चहा-नाश्त्यासाठी हायवेलगत कोटकरुपीमध्ये थांबल्या होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे एक किलोमीटर परिसरात रस्त्यावर मातीचा ढिग जमा झालेला आहे, त्याखाली काही चारचाकी वाहने अडकल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने मंडी ते कुल्लूपर्यंतचा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने हेल्पलाईनही सुरू केल्या आहेत. प्रशासनाने मदत कार्यासाठी तर परिवहन मंडळानेही दोन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.