जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयु) भारत विरोधी घोषणा देणा-या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे परखड मत भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली- ‘जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील भारत विरोधी घोषणा देणा-या देशद्रोह्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत,’ असे परखड मत भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
हे प्रकरण सध्या देशातील चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच आता साक्षी महाराज यांच्या वादग्रस्त विधानामुळे हे प्रकरण आणखी चिखळण्याची शक्यता आहे.
‘देशद्रोह्यांना आयुष्यभर तुरूंगात ठेवण्यापेक्षा त्यांना फासावर लटकवा नाहीतर पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जात असल्याचे मी याआधीपासूनच म्हणत आलो आहे. त्यानंतर अनेक दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
‘आता हा दहशतवाद ‘जेएनयु’ सारख्या जागतिक स्तरावरील महाविद्यालयात देखील पोहोचला आहे. देशाचा अपमान कोणत्याही प्रकारे सहन केला जाऊ शकत नाही, असेही साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वातावरण तापलेले असतांना आता साक्षी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करून या प्रकरणात उडी घेतली आहे.
काय आहे हे जेएनयु प्रकरण?
संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू याला फाशी दिल्याच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणा-या जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हेय्या कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. या आंदोलनात सहभागी इतर विद्यार्थ्यांवरही कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच अफजल गुरूच्या समर्थनार्थ जेएयू विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी घोषणा केली होती. यावेळी त्यांनी देशविरोधी घोषणाही केल्या होत्या.