‘गोमांस खाल्याशिवाय जे लोक राहू शकत नाही त्यांनी हरियाणा राज्यात येऊ नका,’ असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी केले आहे.
अंबाला- ‘गोमांस खाल्याशिवाय जे लोक राहू शकत नाही त्यांनी हरियाणा राज्यात येऊ नका,’ असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी केले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता गोमांसचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
‘जगातील अनेक देशात खाण्या-पिण्याच्या सवयी रुचत नसल्याने आपण तेथे जात नाही.हरियाणामध्ये गोसंरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी होत असल्याने येथे गोमांस खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे ज्या लोकांना गोमांस खाल्याशिवाय जमत नाही त्यांनी हरियाणामध्ये येण्याची गरज नाही,’ असे वीज यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
‘यापूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विदेशी पर्यटकांना बीफ खाण्यासाठी कोणताही परवाना वा सूट देण्यास नकार दिला आहे,’ असेही त्यांनी सांगितले. अनिल वीज यांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी करत त्यासाठी ऑनलाइन सर्व्हेही केला होता.