मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली
मुंबई – मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असल्याचे सिध्द झाले आहे. या हल्ल्याचा तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केली.
राज्य पोलिस महासंचालकाच्या कार्यालयात आयोजित वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव जयंत कुमार बांठीया, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन, राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ आदींसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पोलिस दलातील हुतात्मा झालेल्यांच्या मुलांना नोकरीत आरक्षण ठेवण्याबाबतही विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.