९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली.
पुणे- ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाने मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्याबाहेरच्या ९ संस्था इच्छुक होत्या. मात्र ७ संस्थांनी विविध कारणे देत संमेलन घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तब्बल ४५ वर्षांनी यवतमाळला साहित्य संमेलन होते आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने रविवारी यवतमाळला भेट दिली होती. तेव्हाच या ठिकाणाची औपचारिक घोषणा होणे फक्त बाकी होते. ती मंगळवारी करण्यात आली आहे.
साहित्य संमेलनासाठी महामंडळाला एकूण ९ निमंत्रणे प्राप्त झाली होती. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी (शाखा सातारा), विदर्भ साहित्य संघ (शाखा अमरावती), विदर्भ साहित्य संघ (शाखा वाशीम), साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर, एज्युकेशन सोसायटी, नायगाव (बाजार), जिल्हा नांदेड, कल्याण शिक्षण संस्था (नागपूर-तळोधी), महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जबलपूर, विदर्भ साहित्य संघ, शाखा वर्धा आणि डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र- विदर्भ साहित्य संघ, शाखा, यवतमाळ यांचा समावेश होता.
याआधी यवतमाळमध्ये १९७३ मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. ग. दि. माडगूळकर या संमलेनाचे अध्यक्ष तर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण उद्घाटक होते. जि.प.चे तत्कालीन अध्यक्ष सुधाकरराव नाईक हे स्वागताध्यक्ष होते. त्यांचे काका दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या संमेलनासाठी दिलेले योगदान आजही यवतमाळकरांच्या स्मरणात आहे. शासकीय विद्यालयाच्या भव्य प्रांगणात हे संमेलन झाले होते. आता ४५ वर्षांनंतर पुन्हा यवतमाळ शहर मराठी सारस्वतांची मांदियाळी अनुभवणार आहे.