ज्या विधानसभा मतदारसंघात ६३ पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, अशा ठिकाणी मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली.
मुंबई – ज्या विधानसभा मतदारसंघात ६३ पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, अशा ठिकाणी मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी दिली.
राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सध्या ६३ पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी मतपत्रिकांचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील निवडणुका मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केल्याचेही संपत यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सगळीकडे मतदानयंत्राद्वारे मतदान होणार आहे. अशा वेळी राज्यातील तीन मतदारसंघात पारंपरिक मतपत्रिकांद्वारे मतदान होण्याची शक्यता आहे. मतदान यंत्रातील एका बॅलेट युनिटची क्षमता १६ आहे. अशा चार युनिटना कंट्रोल करण्याची क्षमता कंट्रोल युनिटची आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश बॅलेट युनिटमध्ये होऊ शकणार नाही.
नांदेड जिल्ह्यातील तीन मतदारसंघात ६३ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भोकर मतदारसंघात ७५, उत्तर नांदेड मध्ये ८० आणि दक्षिण नांदेडमध्ये ९१ उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जर यातील कोणी अर्ज मागे घेतले नाहीत, तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मतदान होईल.
राज्यात ८ कोटी ३३ लाख मतदार
राज्यात ८ कोटी ३३ लाख मतदार आहेत. त्यांपैकी ४ कोटी ४० लाख पुरुष तर ३ कोटी ९३ लाख महिला आहेत. शिवाय १३९१ मतदार तृतीयपंथी आहेत. राज्यात एकूण ९१ हजार ९८७ मतदान केंद्र आहेत. त्यांपैकी ३९०० मतदान केंद्र संवेदनशील आहेत. आतापर्यंत निवडणूक आयोगामार्फत केलेल्या कारवाईत राज्यभरात ७ कोटी ३८ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. मतदानापूर्वी प्रत्येक मतदारसंघात तीन पथके तैनात करण्यात येणार आहेत. ही पथके मतदारसंघात वाटले जाणारे पैसे आणि दारू आदी गोष्टींना आळा घालणार आहेत. प्रत्येक मतदाराला वोटिंग स्लिप द्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.