ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे.
रत्नागिरी- ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये मुदत संपणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
आता मे ते जुलै या कालावधीतील मुदत संपणा-या ११२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर ९० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यापूर्वी मे ते ऑगस्ट या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला होता.
त्याप्रमाणे २२ एप्रिलला ही निवडणूक होणार होती. मात्र, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे या कालावधीत निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी विनंती पोलिसांकडून केली होती.
या मागणीनुसार ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणा-या निवडणुका न घेण्याची भूमिका घेण्यात आली असून, या कालावधीमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मे ते जुलै या कालावधीत मुदत संपणा-या ११२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर ९० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मंडणगडमधील चार ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका तर दापोलीतील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होतील.
खेडमधील ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व १० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार असून, चिपळूणमधील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर १५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत.
गुहागरमधील १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका तर संगमेश्वरमधील एका ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर १८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होतील.