म्हाडाच्या २०११ मधील सोडतीतील घरांना मुंबई महापालिकेची ओसी मिळाल्याने लाभार्थ्यांची घराची प्रतीक्षा आता संपणार आहे.
![MHADA building](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/04/MHADA-building-200x300.jpg)
मुंबई – म्हाडाच्या २०११ मधील सोडतीतील घरांना मुंबई महापालिकेची ओसी मिळाल्याने लाभार्थ्यांची घराची प्रतीक्षा आता संपणार आहे. या सोडतीतील लाभार्थ्यांनी घरांची ९० टक्के रक्कम भरली होती. मात्र, महापालिकेच्या ‘ओसी’अभावी त्यांची घरे रखडली होती. सोडतीतील ४ हजार ०३४ लाभार्थ्यांपैकी कांदिवली-शिंपोली, मालवणी-मालाड, गायकवाडनगर येथील ३ हजार ४०८ लाभार्थ्यांना येत्या दोन महिन्यांत घरांचा ताबा मिळणार आहे.
म्हाडाने २०११ मध्ये ४ हजार ०३४ घरांसाठी सोडत काढली होती. सोडतीनंतर अनेक लाभार्थ्यांनी घराची ९० टक्के रक्कम भरताना आवश्यक कागदपत्रांची प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र, म्हाडाकडून महापालिकेची ओसी मिळवण्यातच दोन वर्षे गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षा करण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. अनेकांनी बँकांकडून गृहकर्ज घेऊन घरे खरेदी केली असल्याने व्याजाचे हप्ते सुरू झाले आहेत.
दरम्यान, २०१०च्या सोडतीतील मानखुर्द येथील घरांची किंमत वाढल्याने या घरांची किंमतही वाढणार आहेत. त्यामुळे काही दलालांकडून लाभार्थ्यांना आमिषेही दाखवण्यात आली. मात्र, आता उशिरा का होईना, लवकरच घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा आनंद आहे, असे काही रहिवाशांनी सांगितले.
मिरा रोडच्या घरांचा ताबा दिवाळीत
म्हाडाच्या २०१२च्या सोडतीतील मिरा रोड येथील लाभार्थ्यांना दिवाळीत ताबा मिळणार आहे. या इमारतींच्या मलनिस्सारणाचे काम मिरा-भाईंदर महापालिकेकडून रखडले होते. मात्र, आता ते काम सुरू असून, ऑक्टोबर २०१३ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लाभार्थ्यांना घराचा ताबा देणे शक्य होईल, असे कोकण मंडळाच्या एका अधिका-याने सांगितले.