‘‘म्हाडाने २०११मध्ये काढलेल्या सोडतीत बनावट अर्ज भरलेले १७ दलाल अद्याप मोकाट आहेत.
मुंबई – ‘‘म्हाडाने २०११मध्ये काढलेल्या सोडतीत बनावट अर्ज भरलेले १७ दलाल अद्याप मोकाट आहेत. या दलालांविरोधात म्हाडाने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. मात्र दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी खेरवाडी पोलिसांनी अद्याप त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे हे सर्व दलाल म्हाडाच्या कार्यालयात काही झालेच नसल्याच्या अविर्भात मुक्तपणे संचार करत आहेत.
म्हाडाने २०११मध्ये चार हजार ३४ घरांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. मात्र त्याचा गैरफायदा घेत १७ दलालांनी एकसारखे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक टाकून हजारो अर्ज भरले होते. या अर्जापैकी तब्बल २२४ अर्जदारांना घरे लागली, तर २०१ जणांची
नावे प्रतीक्षा यादीत आली. सोडतीतील सर्व विजेत्यांच्या कागदपत्रांच्या छाननीची प्रक्रिया सुरू असतानाच एका निनावी पत्रामुळे या दलालांचा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी म्हाडाने २२ फेब्रुवारी २०१२ रोजी खेरवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. म्हाडा अधिका-यांनी खेरवाडी पोलिसांना या दलालांची कागदपत्रे सादर केली. मात्र या प्रकरणी काही जणांची चौकशी करण्यापलिकडे पोलिसांनी कोणालाही अद्याप ताब्यात घेतलेले नाही.