दोन गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर हैदराबादमधील राजेंद्रनगरमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/02/afzal-3.jpg)
हैदराबाद – दोन गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर हैदराबादमधील राजेंद्रनगरमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे धार्मिक झेंडा जाळण्यावरुन या हिंसाचाराला सुरुवात झाली. बहादूरपूरामधील सिख चवानी भागात हा हिंसाचार झाला. झेंडा जाळण्याच्या घटनेसाठी दोन युवकांना जबाबदार धरुन, एका समाजाच्या गटाने या युवकांवर हल्ला केला. त्यानंतर या भागातील तणाव वाढला.
राजेंद्रनगरमध्ये काही घरांवर हल्ले झाले असून, या भागात जाळपोळीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही.आनंद आणि अन्य वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मतमोजणीच्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या पोलिस आणि निमलष्करी दलाच्या सशस्त्र तुकडया या भागात तैनात करण्यात आल्या आहेत. वातावरणात तणाव असला तरी, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.