केन्द्रात भाजपचे सरकार आल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’ आले की नाही हा आता जनतेच्या दृष्टीने संशोधनाचा विषय आहे. भाजपच्या दृष्टीने मात्र त्यांनी जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवले आहेत. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जीएसटीच्या अंमलबजावणीची क्रांती करण्यात आली. खरे तर सुधारणा ही टप्प्याटप्प्याने व्हायला हवी, क्रांतीच्या आधी उत्क्रांती व्हायला पाहिजे यावर पंतप्रधान मोदी यांचा विश्वास नसावा. तसे नसेल तर वा-याच्या वेगाने देशात बदल घडवू पाहणा-या मोदी यांना तेवढा वेळ थांबायला सवड नसावी. देशात सर्वत्र समान करप्रणाली होणार आणि वस्तूंचे भावही सर्वत्र समान राहणार या अटकळीने मोठा गाजावाजा करत त्यांनी जीएसटीची अंमलबजावणी केली. आता मोदींनी ‘सौभाग्य’ योजनेद्वारे गरिबांना मोफत विजेची घोषणा केली आहे. केवळ वीज देणार नाही, तर वीजजोडणीही करून देण्यात येणार आहे आणि त्याचा देशातील चार कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे.
देशभरात वीज प्रकल्पासाठी कोळशाच्या साठय़ाची स्थिती सुधारली असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये ३१ मार्च २०१९ पर्यंत वीजपुरवण्याचा निर्धार मोदी सरकारने केला असून, त्यासाठीच्या १६ हजार ३२० कोटींच्या महत्त्वाकांक्षी ‘सौभाग्य’ योजनेचा शुभारंभ त्यांचाच हस्ते सोमवारी करण्यात आला. विजेच्या संकटावर मात करून देश मुबलक विजेच्या; तसेच एक देश, एक ग्रीड आणि एक चार्जच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. सहज, सुलक्ष आणि सुरक्षित वीज उपलब्ध करणे सरकारचे लक्ष्य आहे. सन २०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. जनगणनेत नावे नसलेल्यांनाही दहा टप्प्यांमध्ये वीज बिलाच्या स्वरूपात पाचशे रुपये भरून वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच दुर्गम क्षेत्रात विजेपासून वंचित असलेल्या घरांना बॅटरी बँक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
‘न्यू इंडिया’मध्ये प्रत्येक घरात वीज असेल. म्हणजे मोदी यांच्या स्वप्नातला नवा भारत विजेच्या प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये ३१ मार्च २०१९ पयर्ंत वीज पुरवण्यात येणार असून त्यासाठी १६ हजार ३२० कोटींच्या रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान तसेच ईशान्येकडील राज्यांतील गावे आणि शहरांचे ‘सौभाग्य’ उजळणार आहे. या योजनेत ग्रामीण भागातील घरांपयर्ंत वीज पोहोचविण्यासाठी १४ हजार २५ कोटी, तर शहरी भागातील घरांसाठी १७३२.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यावेळी मोदी मागील सरकारवर टीका करण्यास विसरले नाहीत. आधी देशात कोळसा संपत असल्याच्या बातम्या यायच्या. आता विजेसाठी कोळसा नाही, अशा बातम्या बघायला मिळणार नाहीत, असे मोदी म्हणाले. कोळसा उत्पादनात मागच्या सरकारच्या पाच वर्षाच्या तुलनेत गेल्या तीन वर्षात दीडपट वाढ झाल्याचेही ते सांगतात. आपले सरकार स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करीत असून, अक्षय ऊर्जेवर सतत काम सुरू आहे. भारतात विजेचे उत्पादन उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्य़ांनी वाढल्याचे सांगताना २०१६ मध्ये ‘नासा’ने काढलेल्या छायाचित्रात भारतात झगमगाट दिसत होता, असा दाखलाही त्यांनी दिला आहे. मात्र महाराष्ट्रात या उलट स्थिती आहे. राज्यातील सगळ्याच वीज प्रकल्पाच्या ठिकाणी कोळशाचा ठणठणाट आहे.
त्यामुळे भर पावसातही भारनियमन करण्याची पाळी शासनावर ओढवली. सध्या काही वीज प्रकल्पांना अवघा अध्र्या दिवसच कोळसा पुरेल एवढा साठा आहे. तर काही ठिकाणी सरासरी दोन दिवस पुरेल इतका कोळसा आहे. मागील आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात कोळसा साठय़ाची स्थिती आणखी चिंताजनक आहे. ऑक्टोबर हीटच्या काळात विजेची मागणी वाढल्यानंतर कोळसा टंचाईत आणखी भर पडणार आहे. कोळसाच नसल्याने राज्यातील १४ वीजसंच बंद आहेत. २९ ऑगस्ट आणि १९ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे राज्यातील विजेची मागणी कमी झाली. त्यामुळे विजेचे भारनियमन काही अंशी कमी झाले आणि त्याचा परिणाम जाणवला नाही. पुरवठादार कंपन्यांकडून राज्याला ३० वॅगन्स कोळसा पुरवणे अपेक्षित आहे; पण सध्या जेमतेम २० वॅगन्स कोळसा मिळत आहे. या तुटीमुळे सध्याची गरज असलेला १४ हजार मेगावॉट विजेचा पुरवठा होत नाही. मोदींच्या घोषणा या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केल्या जातात.
महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्या होत असताना त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका जिंकण्यासाठी तेथे कर्जमाफीची घोषणा केली. आता पुढील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी मोफत विजेची घोषणा करून तजवीज करून ठेवली इतकेच. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ नाटकात एक पद आहे.. ‘हे सौख्य खरे की भास खरा, सौभाग्य उमलले का?’ मतदारांनी काँग्रेसला बाहेर काढून भाजपला आत घेतले, हे त्यांचे खरेच सौभाग्य ठरणार की दुर्भाग्य ठरणार हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र वीजटंचाईने महाराष्ट्र काळोखात बुडणार आहे, हे निश्चित!