आपण दररोज अनेक गोष्टींविषयी पुस्तकात, वर्तमानपत्रांत वाचतो किंवा दूरचित्रवाणीवर या गोष्टी पाहतो. त्याविषयीची माहिती आपल्याला नसते. ही माहिती कधी मजेशीर असते तर कधी आपल्या ज्ञानात भर टाकणारी असते. अशाच काही वस्तू, स्थळं, प्राणी यांविषयीची रंजक माहिती छोट्टम मोठ्ठम दोस्तांसाठी –
तुम्हाला तर माहीतच आहे की, बहुतेक झाडं, वेली आपलं अन्न स्वत:च तयार करतात. आपल्या पानांच्या पेशींमधून तर कधी पानाच्या देठांमधून ही अन्न तयार करण्याची क्रिया घडत असते. झाडं किंवा रोपांची मुळं जमिनीतून पाणी शोषून घेतात. हेच पाणी मग पानांच्या शिरांमधून अथवा देठांमधून पानांमध्ये पोहोचतं. वनस्पतींच्या पानांमध्ये ‘क्लोरोप्लास्ट’ नावाच्या पेशी असतात. त्या क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य तयार करतात. त्यामुळेत पानांचा रंग हिरवा दिसतो. या पानांच्या आवरणातून सूर्यप्रकाश शोषला जातो. पानांच्या खालील बाजूला छिद्र असतात, त्यातून हवा शोषली जाते. हवेतून पानांना कार्बन डायऑक्साइड मिळतो. त्यानंतर सूर्यप्रकाशातून मिळालेली ऊर्जा, हवेतून मिळालेले कार्बन डायऑक्साइड आणि जमिनीतून शोषलेले पाणी यांची एकत्रित प्रक्रिया होऊन हरितद्रव्यांच्या साहाय्याने पानं साखर, खळ (स्टार्च) आणि मूलद्रव्य तयार करतात. हेच त्यांचं अन्न असतं. झाडाच्या सर्व भागांमध्ये जिथे नवीन पेशींची गरज असते, तिथे हे अन्न पेशींच्या नवनिर्मितीचं काम करतं. सोबतच फळांमधे गोडवा निर्माण करतं.
नदीच्या अथवा कोणत्याही जलप्रवाहाच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठय़ा प्रमाणात साठा करण्यासाठी बांधलेली भिंत म्हणजेच धरणं. प्राचीन काळी इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन आणि भारत या देशांत कोरडय़ा ऋतूत शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि पुरांपासून संरक्षण करण्यासाठी धरणं बांधण्यात आली होती. धरण मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा साठा करण्याचं काम करत असतं. त्यामुळे या धरणाचा पाया मजबूत असणं आवश्यक असतं. धरणाची उंची ही पाण्याचा साठा किती प्रमाणात करण्यात येणार आहे यावर अवलंबून असते. या धरणांमुळे साठलेल्या पाण्याचा वापर अनेक उपयोगी कामांसाठी केला जातो.
जगातील चौथ्या स्थानावरील, सर्वात मोठा आणि खोल असा महासागर अशी प्रशांत महासागराची अर्थात पॅसिफिक ओशियनची ओळख आहे. पॅसिफिक या शब्दाचा अर्थ आहे शांत. यावरूनच १५२०मध्ये पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांनी या सागराचं नामकरण पॅसिफिक ओशियन (प्रशांत महासागर) असं केलं. या सागराची खोली जवळपास १४,००० फूट इतकी असून पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी एक तृतीयांश भाग त्याने व्यापलेला आहे. त्यातले काही दगड तर २०० दशलक्ष वर्षापूर्वीचे आहेत. या महासागराचा पूर्वेकडील भाग हा उत्तर आणि दक्षिण अमेरिका महाद्वीप, उत्तरेकडील भाग बेरिंग सामुद्रधुनी, पश्चिमेचा भाग आशिया खंड, मलाय द्वीपसमूह आणि ऑस्ट्रेलिया यांनी तर दक्षिणेचा भाग अंटाक्र्टिका यांनी वेढलेला आहे. ३०,००० हजार लहान-मोठी बेटं या सागरात आहेत. आश्चर्य हे आहे की, या सगळ्यांचं क्षेत्रफळ जरी आपण मोजलं तरी प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या केवळ एक चतुर्थाश इतक ते भरतं.
कीटकनाशकांचा वापर कशासाठी केला जातो?
मानव, प्राणी यांना होणा-या काही रोगजंतूंचा प्रसार करणा-या कीटकांना तसंच शेतातील पिकं, साठवलेलं अन्नधान्य, कपडे अशा जीवनावश्यक साहित्य फस्त करणा-या कीटकांचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणा-या रसायनांना कीटकनाशकं म्हणतात. या कीटकनाशकांचं त्यांच्या वापरानुसार वर्गीकरण करण्यात आलं आहे. कीटकांच्या पोटात जाऊन नाश करणारे, स्पर्शजन्य, दैहिक (वनस्पती-प्राण्यांवर फवारण्यात येणारी), धुम्रकारी, प्रलोभक असे या किटकनाशकांचे काही प्रकार आहेत. शेतामध्ये येणारं पीक कीटकांनी खराब केल्यावर त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे अन्नधान्याला कीड लागण्याची शक्यता असते. या किडीपासून/ कीटकांपासून संरक्षण व्हावं, यासाठी शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात. त्यामुळे धान्य कीटकांपासून सुरक्षित राहतं.