‘लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीने आमचा शिवसेना भवन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा कट होता’, असा धक्कादायक दावा हेडलीने शुक्रवारी केला.
मुंबई – ‘लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेच्या मदतीने आमचा शिवसेना भवन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा कट होता’, असा धक्कादायक दावा हेडलीने शुक्रवारी केला. त्यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या राजाराम रेगे याच्याशी जवळीक साधण्याचाही आपण प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.
शिवसेना भवनात आपण त्यावेळी राजाराम रेगे याची भेटही घेतली होती. त्याच्यासोबत जवळीक वाढवण्याचा आपला प्रयत्न होता. शिवसेना भवन पाहण्याची इच्छाही आपण त्याच्याकडे प्रकट केली होती. लष्कर-ए-तोय्यबाचे भविष्यातील अथवा नजीकच्या काळातील लक्ष्य हे शिवसेना भवनच होते, अशी कबुलीही हेडलीने दिली आहे.
हेडलीचे मुंबईत कुणाशी मैत्रीचे संबंध आहेत, याविषयी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याला विविध प्रश्न विचारून त्याची साक्ष नोंदवली. हेडलीने २००६-०७ साली मुंबई भेटीत दक्षिण मुंबईतील ‘मोक्ष’ या जिमलाही भेट दिल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी त्याने विकास वरत या जिमच्या प्रमुखासोबत संबंध वाढवण्याचे प्रयत्न केल्याचेही सांगितले. त्यावेळी विलासचा मित्र राहुल भट यालाही आपण भेटलो होतो. राहुल भटकरवी एका शरीरसौष्ठव स्पर्धेत आपण विलासशी मैत्री वाढवल्याचेही त्याने सांगितले. राहुल हा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा असून २००९ साली त्याचे हेडलीसोबतचे संबंध उघड झाले होते.
सिद्धिविनायक मंदिर परिसरातलाल-पिवळय़ा धाग्यांची खरेदी
मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी आपण दहशतवादी असल्याचे वाटू नये, यासाठी आपण सिद्धिविनायक मंदिर परिसरात लाल-पिवळे गंडेदोरे खरेदी केले होते. यामागील आपला उद्देश आपण भारतीय असल्याचे दाखवणे हा होता, असेही त्याने साक्षीद्वारे सांगितले. मुंबईत आलेले दहशतवादी पकडले जाऊ नये, यासाठी मनगटावर गंडे-दोरे बांधल्याचेही त्याने सांगितले. जुलै २००८ मध्ये आपण सिद्धिविनायक मंदिराला भेट देताना तेथील व्हिडिओही तयार केला होता. कसाबचा फोटो ओळखला दहशतवाद्यांनी मुंबईत उतरण्यासाठी कुलाब्यातील बधवार पार्कची निवड केली होती. हा झोपडी परिसर असल्याने मुंबईत उतरण्यासाठी तो सुरक्षित परिसर असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, ‘हेडलीला २६/११ च्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याचा फोटोही दाखवला. त्यावर हेडलीने ‘हा अजमल कसाब रेहमतुल्ला असल्याचे न्यायालयाला सांगितले.
राजाराम रेगे कोण?
हेडलीने जबानीत रेगे यांचे नाव घेतल्यामुळे शिवसेना भवनात ८ ते ९ वर्षापूर्वी सतत राबता असलेल्या राजाराम रेगे यांचे नाव चर्चेत आले. राजाराम रेगे आयटी तज्ज्ञ असल्यामुळे २००७मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना अपेक्षित अशी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. याचवेळी त्यांची भेट हेडली याच्याशी झाली आणि मोठे बनवण्याची स्वप्ने बाळगणा-या रेगेने अमेरिकेत आपला व्यवसाय करता यावा, यासाठी हेडलीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता, असे बोलले जात आहे. ‘विलास वरत या व्यक्तीने हेडलीची भेट घडवून दिली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना भवन पाहायचे आहे, अशी इच्छा प्रकट केली होती. परंतु आपण त्याला शिवसेना भवन पाहण्यास दिले नव्हते,’ असे राजाराम रेगे यांनी स्पष्ट केले. आपला शिवसेनेशी काहीही संबंधच नसून आपण पदाधिकारीही नसल्याचे रेगे यांचे म्हणणे आहे. मात्र विलास वरत यांनी त्याची माझ्याशी का भेट करून दिली आणि त्यामागचा त्यांचा हेतू काय होता हे आपल्याला माहीत नव्हते,असे त्यांनी म्हटले आहे.
हेडली हा पक्का थापाडय़ा
नवी दिल्ली – ‘डेव्हिड हेडली हा त्याच्या साक्षीत कोणतीही नवी गोष्ट सांगत नसून तो सराईत थापेबाज आहे. ऐकीव माहिती, इकडून-तिकडून गोळा केलेली माहिती एकत्र करून सांगण्याची त्याला सवय आहे. सध्या त्याचे तेच सुरू आहे. इशरत जहाँविषयी त्याने दिलेली माहितीही मूळ मुद्दय़ाला बगल देण्यासाठी केलेली थापेबाजीच आहे’, असा दावा २६/११ हल्ल्याविषयी पुस्तक लिहिणारे पुरस्कारविजेते पत्रकार अॅड्रियन लेव्ही यांनी केला आहे.
लेव्ही हे ‘द सीज : द अॅटॅक ऑन द ताज’ या पुस्तकाचे सहलेखक आहेत. ‘हेडलीने याआधी एलईटी, आयएसआय, सीआयएलाही थापा मारल्या होत्या. आता तो भारताला गुंडाळतोय. आतापर्यंतच्या त्याच्या साक्षीत त्याने आधी दिलेल्या जबानीपेक्षा वेगळे असे फारसे काहीही सांगितलेले नाही. पण तो पक्का बनेल, खोटारडा आहे. चौकशीदरम्यान तो अनुभवी प्रश्नकर्त्यांनाही लीलया गुंडाळतो, हे लक्षात घ्यायला हवे. एफबीआयने केलेल्या त्याच्या चौकशीचा व्हीडिओ पाहिलात तर हे सहज लक्षात येते, असेही लेव्ही यांनी म्हटले आहे.
‘अर्धसत्य गोष्टी, ऐकीव माहिती यातून तो समोरच्याला घोळात घेतो. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी, त्याची कातडी वाचवण्यासाठी त्याने आजवर त्याच्या जवळच्या अशा प्रत्येक व्यक्तीचा, अगदी पत्नी, मैत्रिणी, बालपणीचे मित्र असा सगळ्यांचाच विश्वासघात केला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. इशरत जहाँचा दावा हे हेडलीच्या थापेबाजीचे उत्तम उदाहरण आहे. ऐकीव माहिती आणि अर्धसत्य यातून त्याने ही विश्वासार्हता वाटावी अशी कथा रचली आहे. मुंबईवर हल्ल्याच्या आधीच्या दोन प्रयत्नांशी त्याचा प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता. त्याला ही माहिती नंतर कळल्यावर आता गोपनीय गोष्टी म्हणून तो त्या पुढे करतो आहे. भारतीयांसाठी त्याने पुन्हा हफीझ सईदचे नाव घेतले आहे. प्रत्यक्षात सईदने त्याला दूरच ठेवले होते. तो डबल एजंट असल्याचा त्याला संशय आला होता. लष्करचीही त्याच्यावर बारीक नजर होती. त्यामुळेच त्याला २६/११ च्या प्रत्यक्ष कटव्यवस्थापनापासून दूर ठेवण्यात आले होते.
आयएसआयलाही तो फितूर असल्याची खात्री पटली होती. म्हणूनच त्यांनी हेडलीशी थेट भेटीगाठी टाळून फक्त इमेल आणि सांकेतिक दूरध्वनींद्वारे संपर्क ठेवत त्याला मुंबईतील भलत्याच स्थळांची पाहणी करण्यासाठी पाठवले. ही स्थळे हल्ल्यासाठी निवडण्यात येणारच नव्हती. ही सगळी माहितीच तो आता भारताला त्याला हव्या त्या प्रकारे सरमिसळ करून सांगतो आहे.
त्याने धूर्तपणे सगळ्यांनाच एकाचवेळी नाचवले. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना त्याचा फार मोठा फटका बसला. त्यांनी त्याला इतकी मोकळीक दिली की पुढे मुंबईवरील हल्ला रोखणे अशक्य झाले. अमेरिकन यंत्रणांनी मुंबईतील निशाण्यांची कल्पना भारताला देऊनही सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यात आल्या नाहीत आणि समुद्रमार्गे होणारा हल्ला रोखण्यासाठीही काही प्रयत्न करण्यात आले नाहीत, हे भारतीय यंत्रणांचे अपयश आहे, असे लेव्ही यांनी म्हटले आहे. भारताची सध्याची सुरक्षाविषयक परिस्थितीही दयनीयच आहे. आयबी, रॉ या यंत्रणांकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, त्यांचे आधुनिकीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. या गोष्टी चिंताजनक आहेत. गुप्तचर यंत्रणांमध्ये नव्या रक्ताची, नव्या योजनांची, निष्णात गुप्तचरांची गरज आहे. या यंत्रणांमधील नगण्य महिलावर्ग आणि हिंदूंखेरीज इतर धर्मीय कर्मचा-यांचाही अगदी किरकोळ टक्का हे चित्रही सुधारण्याची निकड आहे’, असे मतप्रदर्शन लेव्ही यांनी केले आहे.