स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि कोकणातील काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मुंबई- १ मेच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि कोकणातील काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना अभिवादन सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळय़ाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा प्रातिनिधिक सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी ७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील रंगशारदा सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.
या भव्य सोहळय़ाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे भूषवणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अॅड. राजेंद्र पै, साहित्य संमेलनाचे समन्वयक श्री. सचिन ईटकर आणि दैनिक ‘प्रहार’चे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मान्यवरांचे संयुक्त महाराष्ट्र या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या सोहळय़ात सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग स्वाभिमान संघटनेमुळे मिळणार आहे. तेव्हा उराशी अखंड महाराष्ट्राचा विचार बाळगून मोठ्या संख्येने या सोहळय़ात सहभागी होण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.