मुंबई हे देशातील अनेकांचे आश्रयस्थान आहे. श्रीमंत, गरीब असो की, कोणत्याही धर्म, जातीतील व्यक्ती असो मुंबई म्हणजे प्रत्येकाला निश्चितपणे पोट भरू देणारी नगरी आहे. मात्र, देशाला सर्व प्रकारची आर्थिक रसद पुरवणा-या या नगरीवर १२ मार्च १९९३मध्ये पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकपुरस्कृत दहशतवादी, असंतुष्ट स्थानिक आणि धर्माच्या नावावर मुस्लिम तरुणांना भडकावून अत्यंत योजनाबद्धरीत्या बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली. त्यावेळेपासून सुरू झालेली दहशतवादी हल्ल्यांची साखळी अजूनही तुटलेली नाही. बस, लोकल, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करत आहेत. यात शेकडो निष्पाप मृत्युमुखी पडत आहेत. अमेरिकेत ज्याप्रमाणे ९/११च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना डोके वर काढता येणार नाही, याची खबरदारी तेथील प्रशासनाने घेतली तशी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून मुंबई सुरक्षित ठेवणे, आवश्यक आहे. मुंबईमधील दहशतवादी कारवायात बळी पडलेल्या निष्पापांना हीच खरी आदरांजली ठरेल.
‘मुंबई नगरी बडी बाका । जशी रावणाची लंका
वाजतो तिचा डंका । त्रिभुवनात’
अशी शाहिरांच्या कवनातून जिची ओळख झाली आहे. तिच्या आर्थिक भपक्याच्या चमचमाटामुळे गाव-खेडयातील कोटयवधी नवयुवकांना श्रीमंती स्वप्ने पडली आणि मग या चमचमत्या स्वप्नांचा पाठलाग करीत अनेक पिढया ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहाँ, जरा हटके, जरा बचके यह है बॉम्बे मेरी जान’ असे गुणगुणत जगल्या, मेल्या आणि नव्या स्वप्नांसह पुन्हा जन्मल्या. अशा या मुंबईने अनेक स्थित्यंतरे पाहिली. अनेक मन्वंतरे अनुभवली. कोळी-आगरी-भंडारी लोकांची वस्ती असणा-या सात बेटांचा समूह ते आजची महामुंबई. जिचे हात नवी मुंबईच्या पुढे रायगड जिल्हयात आणि इकडे विरार-डहाणू, कर्जत-कसा-याच्या पुढे ठाणे-पुणे जिल्हयाच्या वेशींना कवेत घेत आहेत, ती अतिविशाल मुंबई हा प्रवास विलक्षण आहे. परंतु या स्थित्यंतरातील सगळयात क्लेषदायक टप्पा मानता येईल, असा दिवस म्हणजे १२ मार्च १९९३चा ‘काळा शुक्रवार.’ याच दिवशी झालेल्या सलग १३ बॉम्बस्फोटांनी मुंबईच्या सुरक्षिततेचे तीन-तेरा वाजले होते. १९९१-९२ मध्ये मुंबईत झालेल्या जातीय दंगलीचा बदला म्हणून दुबईत बसलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि त्यांच्या साथीदारांनी पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या मदतीने मुंबईतही बॉम्बस्फोट मालिका घडवून आणली होती. तेव्हापासून आजतागायत मुंबई पाकपुरस्कृत दहशतवाद्यांच्या रडारवर आहे. कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीला जर रोखायचे असेल तर ज्या शहरात आर्थिक केंद्र एकवटली आहेत, त्यावर हल्ला करायचा हे काम पाकिस्तानने काही देशद्रोही तस्कर-गुंडांना हाताशी धरून पार पाडले होते. कारण मुंबई म्हणजे फक्त लोकसंख्येने देशातील मोठे शहर नाही तर या शहराएवढी आर्थिक उलाढाल होणारे दुसरे शहर भारतात नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, जीवन विमा, टाटा समूह, रिलायन्स, गोदरेज, लार्सन अँड टुब्रो अशा एकाहून एक मातब्बर संस्था, कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. मुंबईतून देशाला सर्वाधिक सीमा शुल्क (६० टक्के), प्राप्तिकर (३३ टक्के) आणि उत्पादन शुल्क (एकूण देशापैकी २० टक्के) मिळतो. त्यामुळे मुंबईनगरी ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून नव्हे तर भारताच्या आर्थिक आघाडीवरील यशाचे प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाते. आणि या मोठेपणामुळेच दहशतवाद्यांची वाकडी नजर या कोटय़वधी लोकांना रोजी-रोटी देणा-या महानगरावर पडली असावी. ज्या बाबरी मशिदीच्या पतनानंतर मुंबईत प्रचंड मोठी जातीय दंगल उसळली होती त्या जातीय दंगलीत मुस्लिमांवर अन्याय झाला, असा प्रचार करून मुंबईतील ‘आयएसआय’च्या हस्तकांनी तरुणांची माथी भडकवली होती. त्यातील असगर युसूफ मुकादम आणि शहानवाज कुरेशीसारख्या युवकांना पाकिस्तानला नेऊन प्रशिक्षण देण्यात आले होते. याची माहिती स्फोटानंतरच्या तपासात पुढे आली होती. परंतु त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या पोलिस दलाने जर थोडी जरी सावधानता दाखवली असती तरी मुंबईच्या मागे लागलेले हे घातचक्र सुरू होण्यापूर्वीच थांबले असते. नऊ मार्च १९९३ रोजी वांद्रयानजीकच्या बेहराम पाडय़ातील गुल नूर मोहम्मद शेख ऊर्फ गुल्लू याला स्थानिक पोलिसांनी पकडले होते. १९९२-९३च्या जातीय दंगलीतील सक्रिय सहभागामुळे गुल्लू पोलिसांना हवा होता. परंतु तो सापडत नव्हता. म्हणून पोलिसांनी त्याच्या भावालाच अटक केली होती. दरम्यान, पोलिसांच्या भीतीने गायब झालेला गुल्लू टायगर मेमनच्या १९ जणांच्या टोळीसोबत पाकिस्तानला जाऊन आला होता. दुबईमार्गे पाकिस्तानला जाऊन त्याने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षित टोळीच्या साथीने टायगर मेमनने शिवजयंतीच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवण्याचे षड्यंत्र रचले होते. परंतु चार मार्च १९९३ला भारतात परतल्यावर गुल्लूला आपला भाऊ तुरुंगात असल्याचे कळले आणि भावाला सोडवण्यासाठी तो पोलिसांना शरण गेला. तो फक्त शरण गेला नाही, त्याने फक्त आपला दंगलीत असलेला सहभाग मान्य केला नाही, तर त्याने टायगर मेमनच्या माध्यमातून मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचे कारस्थान रचले जात आहे, अशी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. आपल्या पाकिस्तानातील प्रशिक्षणाची इत्यंभूत हकिकत सांगितली. परंतु आमच्या रिकाम्या डोक्याच्या पोलिसांना त्या माहितीचे महत्त्वच कळले नाही. त्यांनी गुल्लूची माहिती हसण्यावारी नेली. परंतु तिकडे टायगर मेमन गुल्लूच्या अटकेने अस्वस्थ झाला. त्याने एप्रिलमध्ये जे स्फोट करायचे ठरवले होते, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे ठरवले आणि १२ मार्च १९९३ हा दिवस मुंबईसाठी घातवार ठरला. सगळयात वाईट म्हणजे, त्या घटनेने पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया स्थानिक असंतुष्टांच्या मदतीने पार पाडल्या जातात, हे सिद्ध झाले. परिणामी आजवर अनेक स्थित्यंतर पाहिलेल्या आमच्या मुंबापुरीला वारंवार घायाळ होताना पाहावे लागले. सहा डिसेंबर २००२ मध्ये घाटकोपरला बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. २७ जानेवारी २००३मध्ये विलेपार्लेत स्फोट झाला. १४ मार्च २००३ मध्ये मुलुंडला लोकलमध्ये स्फोट होऊन १० लोक दगावले. २८ जुलै २००३ मध्ये घाटकोपरला बेस्ट बसमध्ये बॉम्बस्फोट होऊन चार लोक ठार झाले. २५ ऑगस्ट २००२ला झवेरी बाजार आणि गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांनी ५० जणांचा बळी घेतला. ११ जुलै २००६ मध्ये लोकलमध्ये सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, त्यात २०७ जण ठार झाले. त्यानंतर गाजला मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भीषण दहशतवादी हल्ला. १२ मार्च १९९३ रोजी सुरू झालेली ही दहशतवादी हल्ल्यांची साखळी अजूनही तुटलेली नाही. अमेरिकेत ज्याप्रमाणे ९/११च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना डोके वर काढता येणार नाही, अशी स्थिती तेथील प्रशासनाने केली, तशी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून मुंबई सुरक्षित ठेवणे, हीच मुंबईमधील दहशतवादी कारवायात बळी पडलेल्या निष्पापांना खरी श्रद्धांजली ठरेल.
[EPSB]
ग्रहण लागलेला पक्ष
काँग्रेसची प्रतिमा ज्याप्रमाणे सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून जनमानसात रुजली आहे, त्याप्रमाणे भाजपची प्रतिमा रुजलेली नाही. भाजपची प्रतिमा प्रामुख्याने निर्माण झाली ती दलित, मुस्लीमविरोधी पक्ष म्हणून. उच्चवर्णीयांचा भाजप हा दलित, मुस्लिमांच्या हितसंबंधांच्या आड येणारा पक्ष म्हणून त्याची ख्याती झाली. उलट काँग्रेस हा दलित, मुस्लिमांचा हितचिंतक व हितकर्ता पक्ष अशीच त्याची प्रथमपासून प्रतिमा राहिली. निष्कलंक चारित्र्याच्या नेत्यांचा पक्ष […]
जखम… २० वर्षे सलणारी!
मुंबईकरांच्या धावपळीच्या परंतु निर्धास्त जीवनाला खीळ घालणा-या आणि जीवन किती असुरक्षित आहे, याची पहिल्यांदा जाणीव करून देणा-या त्या घटनेला आज २० वर्षे होत आहेत. अनेकांचे बळी घेणा-या, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणा-या या घटनेने मुंबईकरांच्या धैर्याची परीक्षा घेतली. त्यानंतरही मुंबईवर तशा प्रकारचे हल्ले झाले आणि मुंबईकरांनी ते त्याच वृत्तीने परतवले असले तरी १२ मार्च १९९३च्या त्या […]
[/EPSB]