निसर्गसंपन्न भूमीत हजारो प्रकारच्या वनऔषधी, अनेक वैशिष्टय़पूर्ण साधनसामग्री मिळत आहे. ज्याला जे हवे आहे त्याचा तो शोध घेत असतो. आणि कुठच्या ना कुठच्या भागात त्याची इच्छा पूर्ण होते. फेणी कुठे मिळते तुम्हाला माहीत आहे का, विषाची बाजारपेठ तुम्हाला माहीत आहे का, कुल्र्याच्याही माळा मिळतात. मासे वाटयावर मिळतात. काताच्या वडय़ांची पेठ माहीत आहे का?
उत्तर काहीही असो.. तुमचे डोळे मोठे झाले असतीलही.. वनऔषधी सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी आढळतात, पण या जैवसंपत्तीचा शोध घ्यायला हवा. येथील तंत्रज्ञान जेवढे प्रसिध्द तेवढाच मालवणी मुलखाचा स्वभावही! सिंधुदुर्गातील कुडाळ येथे होणा-या अडकित्याची दखल मस्कतला घेतली गेली होती. पणदूर तिठयावरील सुतार बंधूंचे अडकित्ते आपल्याकडे असणे म्हणजे मानाचे समजले जायचे.
कोकणातील मूर्तिकारागीरही सर्वदूर प्रसिध्द होते. येथील दगडाला देवत्व देणा-या मूर्तिकारागीरांच्या कौशल्याला सातासमुद्रापलीकडे मागणी होती. इतिहासात त्याच्या नोंदीही आहेत. काही बाजारपेठा न्याहाळताना अनेक वैशिष्टय़ हाती लागतात. तेरेखोलच्या बाजारपेठेत हजारो बोंडूंचे ढीगच लागलेले दिसतात. येथे म्हणे गोव्याच्या फेणीचा मोठा प्रभाव आहे. या फेणीसाठी लागणा-या काजू बोंडूंची मागणी मोठी असते. यामुळे एकदा का मार्च सुरू झाला की मे महिना संपेपर्यंत तेरेखोलचे रस्ते काजू बोंडूंच्या दरवळाने भारलेले असतात.
येथे नव्याने पोहोचणा-याला उग्र दर्प असहय़ होतो. येथील माणसांना हे सारे नित्याचेच झाले आहे. येथे बोंडू हे टोपलीवर विकत घेतले जातात. पूर्वी हे माप गोणीवर असायचे. आता ते किलोवर पोहोचले आहे. बाहेर दिवस-रात्र बोंडू कुजत टाकलेले असायचे. पण अलीकडे यात बदल झाला आहे. आता सर्व प्रक्रिया बंद खोलीत होते. तरीही दोन-तीन किलोमीटर परिसर काजू फेणीच्या गंधाने भरलेला आहे, असे वाटते. पाण्यालाही येथे म्हणे त्याचाच स्वाद येत असतो.
तेरेखोल ही बाजारपेठ अलीकडे थोडी सावरलेली आहे नव्या काही धोरणात्मक निर्णयामुळे आता बोंडूंची प्रक्रिया तंत्रशुध्द होते. तेरेखोलच्या पुढे येताच दोडामार्गकडे वळसा घेतला तर भेडशीच्या बाजारपेठेत मिळणारी कंदमुळाची चकती मूळव्याधीवर ही एखादया बडया कॅप्सुलपेक्षा रामबाण ठरते असे ग्रामस्थ सांगतात. येथे बरेच काही छोटे-मोठया मुळी मिळतात.
ताण पडू नये यासाठी कसल्याशा वेलीचा गुंता घातलेले लॉकेट येथे सहज मिळते. हे लॉकेट गळयात बांधल्यावर अथवा शरीराच्या कुठल्याही अवयवावर बांधायचे म्हणजे त्रास कमी होतो, असे विक्रेते सांगतात. कापरभेंडीचे पाळ, रक्तचंदनाची बाहुली, बिब्बा, अमृतवेल नि काय नि काय.. आपल्याला हवे ते घ्यायचे. जणू काही आयुर्वेदाचा खजिना यात पावलोपावली आपल्यासाठीच असतो.
प्रत्येक बाजारपेठेतील भाषा ही वेगळी. कुणी थेट घरातील नाते जोडतो. तर कुणी आपला जीवाभावाचा सखा मिळालाय असा संवाद साधतो. अनेक ज्येष्ठ मंडळी सांगतात की, या वनऔषधी फार पूर्वीपासून येथे येतात. आणणारी माणसे बदलली, पण औषधांची विक्री कमी झालेली नाही.
शिरोडयातील मिठाचा बाजार सर्वाना माहीत आहे. मात्र येथे कुल्र्याच्या मिळणा-या माळा आणि वाटयावर मिळणारे मासे यांची खासियत काही वेगळी आहे. कोकणातील एकूण बाजारपेठांचा इतिहास न्याहाळताना काही बदनाम पेठांची दखल घ्यायलाच हवी. आज मुंबईत चोर बाजार प्रसिध्द आहे. मात्र अठराव्या शतकात वेंगुल्र्यात अनेक दर्यावर्दी मंडळी चोरटया साहित्याचा लिलाव करायची. देश-विदेशातील जहाजांवरचा चाच्यांनी लुटलेला माल येथे विक्रीस यायचा.
डच व्यापा-यांच्या वांश्चमयातयाची नोंद आढळते व आश्चर्यही वाटते. विषाची कधी पेठ असेल का, पण सत्य आहे. सापाचे विष काढून विकण्याची तळकोकणातली परंपरा आजची नाही तर आदीम आहे. सोमरसाच्या पेठे प्रमाणे ही पेठ बदनाम आहे. अलीकडे सरकारने वनसंपत्तीच्या नव्या कायद्यान्वये या प्रकाराला बंदी घातली आहे. तरीही सापांची विक्री, त्यांच्या विषांची विक्री काळया बाजारात का असेना होत असते. पूर्वी दिवसाढवळया चालणारा हा व्यापार कोणत्या पेठेत सुरू होता हे आणखी स्पष्ट करायला नको. तळ कोकणात सापांची विक्री अगदी काल-परवापर्यंती खुलेआम व्हायची, सापाच्या विषासाठी या परिसरातील काही पेठांमधून विशिष्ट संकेत घेऊन दाखल व्हायचे.
अंमली पदार्थावर बंदी
पूर्वी बंदर पेठांमध्ये ज्या भागात पोपट ओरडत असायचा तेथे अंमली पदार्थ निश्चत मिळणार असा संकेत ठरलेला असायचा. अपू, गांजा येथे मिळायचा ही एक आंतरराष्ट्रीय खूण होती, असेच सांगितले जाते. राज्यात या नशेच्या अंमली पदार्थावर बंदी आणण्यात आली व पोपटही पिंज-यातून मुक्त झाले. नव्या बाजारपेठांचा वेध घेताना हा जुना इतिहास समजून घेताना हा भाग हजारो ग्राहकांच्या हजारो सेवा पूर्ण करण्यासाठी व्यस्त असायचा हे लक्षात येते. सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको.. या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास.. परंतु या जहरी सापांचे विष अगदी दिवसाढवळया येथे विक्रीला जायचे.
साप म्हटला की अंगावर काटाच उभा राहतो.. आणि तो विषारी कोब्रा असेल तर अगदी प्राणाशीच गाठ. परंतु याच सापाच्या विषाच्या व्यापार सुरू होता. परभागातील वैद्य,हकीम येथे आवर्जून यायचे.अगदी अलीकडेही शास्त्रज्ञ कोकणात सापाच्या विषासाठी येत होते. प्राणीशास्त्रज्ञांच्या मतानुसार एक नाग १५ ते २० मिली लिटर विष बाहेर टाकतो. सापाला अनेक दिवस पकडून विष काढले जाऊ शकते.
सापाचे विष हे लाळेसारखे असते. एकदा त्याच्या तोंडातून विष काढले की पुन्हा काही वेळाने विष काढता येऊ शकते. सापामध्ये विष निर्माण होण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. कोकणात प्रामुख्याने नाग, फुरसे, घोणस, मण्यार हे साप आढळतात. या सापांना पकडून त्यांच्या होत असलेल्या विषाची तस्करीची चर्चा मागील काही दशकात होती. अलिकडे अशी चर्चापुन्हा अननसाच्या बागांमध्ये तयार करण्यात आलेल्या सर्पालयाबाबत होत आहे.
कोकणातील बांबू व्यापारही प्रसिध्द आहे.काही वर्षापुर्वी लाकडाचा व्यापार या भागात फोफावलेला होता. आता तोही थांबला आहे. मात्र काताचा व्यापार सुरु आहे. या व्यापारामुळे काही बाजारांना उर्जितावस्था लाभली.तर काहींची बदनामी झाली. मात्र एक खरे की, या बाजारांनी आपला असा ठसा निश्चितच मुद्रीत केला आहे. आणि त्याची एक अस्सल खासीयत आहे.
जनतेची जी मागणी असते. तसा पुरवठा होत असतो. वेंगुल्र्याहून कुडाळकडे सडयावरून जाताना वाटेत पालेभाजीचे ढीगच्या ढीग पाहायला मिळतात. चेंदवण, वालावल, पाटचा हा परिसर असल्याचे सांगितले जाते. येथील मंडळी बारमाही शेतीत व्यस्त असतात. शेतात जे काय उगवेल त्याचा थेट व्यापार सुरू होतो. असाच अनुभव महामार्गावरच्या कुडाळ दरम्यान साळगाव ,बिबवणे, झाराप परिसरात येतो.
कलिंगडाचा व्यापार अलीकडे बहरला आहे. महामार्गावरून जाणारी-येणारी मंडळी क्षणभर थांबून कलिंगडे खरेदी करीत असतात. व्यापार उदिमाचे हे मोठे साधन बनले आहे. काळाची गरज ओळखून येथील शेतक-यांनी आपल्या शेतीतही बदल केले आहेत. याच परिसरात महामार्गावर आंबा, फणस,जांभूळाची दुकाने गजबजून जातात. हा हंगामी व्यापार!