‘जिता जित्राब तो मराक देवचो नाय!’ असे शेतक-याला वाटते खरे; पण वास्तव पाहून त्याचे काळीज चर्र होते. हिरवीगार भातशेती तारुण्यात पोहोचली आहे. तिला अद्यापि बाळसे धरता आलेले नाही. ती खंगली आहे. तिच्यावर औषध फवारणी केली तरी शेतकरी चिंतातूर आहे. कारण तिची प्रकृती सुधारलेली नाही. तिला हवा असलेला तिचा सखा पाऊस थोडा रागवलेला आहे. यावर्षी त्याची कामगिरी निच्चांकी आहे. त्याच्या या निच्चांकाने पुढचा हंगाम काजळून गेला आहे. कोकणाच्या निसर्गाच्या हिरव्यागार शालूचे पदर फिके पडू लागले आहेत. त्याची रंग उडण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याची कोणतीही तमा न बाळगणा-या मुलखाच्या वेशीवर जलसंकट घंटानाद करू लागले आहे..
कोकणातील पावसाळा म्हणजे पूर अन् तुफान वेगाने रोरावणा-या नद्या.. हिरव्यागार थाटात पाण्याची लयलूटच जणू. पण यावर्षी या सर्व परंपराना बट्टा लागला आहे. हिरवी शेती फिकी पडली आहे. आकाशात ढग येतात पाहुण्यासारखे वावरतात आणि निघून जातात. हक्काचा दणदणाट नसतो आणि तुफानाला ती गतीही देत नाही. कधी कधी गावागावांमध्ये हुलकावणी देत त्याची रिमझिम चालू असते. या गावचा पाऊस सीमेपर्यंत पोहचेल याची शाश्वती देता येत नाही. मालवणी मुलखातला पाऊस कसा बिनधास्त बरसणारा.. संततधार.. चोवीस तास.. आठ्ठेचाळीस तर कधी त्याहून अधिक.. त्याची ही धार काळजाची धडकी भरवणारी असायची; पण त्याचे तुफान हवे-हवेसे वाटणारे या तुफानाने सह्याद्री मनसोक्त पाझरू लागतो. धबधब्यांची संख्या कलाकलाने वाढत जाते. नद्या, नाले रौद्ररूप धारण करतात. वाटांची साफसफाई हे तुफानच करते. मिळेल तिथे पाण्याचा वावर सुरू होते. शेता-भातात, घराच्या दारापर्यंत पाणीच पाणी होत असते. त्याचे रौद्ररूप पाहून केव्हा केव्हा समुद्रही त्याला विरोध करायचा, मग त्याचे पाणी खाडीत अडायचे. पाण्याची फुग भरू लागायची. पुराचे पाणी मग एक एक करून भाग गिळू लागायचे. रस्ते पाण्याखाली जायचे.
अशा पुरांची या मातीला तशी सवयच झालेली. सर थांबली की, घटकाभरातच सारं काही निर्धोक व्हायचे. गवताचे पाते डोके वर करायचे, हसायचे, खिदळायचे आणि पाऊसालाच पुन्हा खिजवायचे. पुन्हा धार बरसू लागायची. आभाळा फाटले की काय असे केव्हा केव्हा वाटू लागायचे. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यातला हा हटकून अनुभव असायचा. श्रावणाबरोबर मग पाऊस थोडा शांत व्हायचा नारळीपौर्णिमेनंतर त्याची भीती कमी व्हायची. एव्हाना छपराची धार मोठी झालेली असायची. विहिरी काठोकाठ भरून जायच्या. तलावांची तहान पूर्ण व्हायची. दरवर्षी पाऊस आपला नवा उच्चांक गाठायचा. पावसाळी हंगाम स्मरणात ठेवायला लावायचा. त्याने पंधरा दिवस, महिनाभर पाठ फिरवली तरी तो उद्दिष्ट पूर्ण?करायचा. पण यावर्षी विपरीत घडले.
श्रावण निम्मा सरला. पावसाची नक्षत्रे संपली तीन महिने रिमझिमतच गेले. पण पूर काही आला नाही. नद्या, नाल्यांना जोष नाही. समुद्र घोंगावला, सह्याद्रीत वादळ झाले, गारांचा खच पडला. पण पावसाला यावर्षी उद्दिष्ट गाठता आले नाही. तो अगदी तोलून, मापून वावरू लागला आहे. गेल्या कित्येक वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच या महिन्यात निम्म्याने तो कमी झाला आहे. ऋतुचक्रच बदलून टाकले आहे. वर्षभर तो कोसळतो आहे. आंब्याला त्याने फोडून काढले. काजूला झोडपले. मग मृगाला हुलकावणी देत तो दाखल झाला. पेरणी झाली. रडत-खडत लावणीही झाली; पण शेतीला जोर येईना. त्याची रग कुठेच दिसेना. तुफान अंगाखांद्यावर खेळवणा-या, त्याचा रांगडपणा सोसणा-या लाल मातीला त्याचा हा सोज्वळपणा कसा सहन होईल? हिरवे शेत आता लाल होऊ लागले आहे. दाट हिरवाई फिकी पडू लागली आहे. काही भातशेती तग धरण्याचा प्रयत्न करते. तर काही सावरण्यापूर्वीच कोसळली आहे. फुलो-यावर येण्यासाठी धडपडणारे भात गर्भार होण्यापूर्वीच कोमेजून गेले आहेत. त्याला तांबो-याने ग्रासले आहे. करप्याने गाठले आहे. जिता जित्राब तो मारूचा नाय असा मोठा विश्वास असल्याने हस्ते परहस्ते पाण्याची वाट अडवून तर कधी शिंपन घालून तर कधी लाठीच्या साह्याने पाणी ओतून भरडी जागेत त्याने लावणी पूर्ण केली. पण पावसाची संततधार सुरू होईना आणि शेतीही बाळसे धरेना. हळवी शेती कांडरली आहे. फुलो-यावर सरकू लागली आहे. पण ती कुपोषणातच आहे. यावर्षी पन्नास टक्के उत्पन्न मिळाले तरीही समाधान मानावे अशी सारी स्थिती आहे. गेल्यावर्षी बरा होता हे नित्याचे पालूपद यावर्षी तोंडचे पाणी पळवत आहे.
शेती बदलली आहे, क्षेत्र फिके पडले आहे
यावर्षी सराई कशी असेल हे आता सांगणे अवघड आहे. चिंतेने मुलखातला शेतकरी आतल्या आत पोखरून गेला आहे. त्याची झोप उडाली आहे. आधीच नुकसानी शेती करणारा शेतकरी कोलमडून गेला आहे. निसर्गाच्या कृपेमुळे ऐश-आरामात सण-उत्सवात जगणा-या या मुलखाच्या वेशीवर आता संकटे चालून येऊ लागली आहेत.
गावचे गावपण बदलते आहे
पहिल्यांदा शेती बदलली. तसा आता गाव बदलू लागला आहे. सरकार काही मदत करेल आणि त्याने ती करावी असे आमच्या शेतक-याला वाटत नाही. कारण सरकार या यंत्रणेवर विश्वासच नाही. आमच्या भावना समजतीलही पण ते तरी काय करणार, असा त्याचा उपहासात्मक सूर आहे. हिरवी शेती पांढरी झाली म्हणून कृषी विभागाच्या अधिका-यांना सांगितले, ते बांधावरून फिरून गेले. कृषीतज्ज्ञांनाही साकडे घातले, त्यांनीही येऊन शेती पाहिली. ५० टक्के अनुदावर औषधे देतो म्हणून सांगितले. कशी फवारायची माहिती दिली. मोठय़ा अपेक्षेने दोन-तीन वेळा शेतात फवारणी केली. पण फिकी शेती हिरवी होईना. मग कृषी विभागाच्या अधिका-यांना पुन्हा भेटलो, त्यांनी आमच्याकडची औषधे संपली, औषध दुकानात जाऊन खरेदी करा म्हणून सांगितले. त्यांना म्हटले या औषध फवारणीने शेती सुधारेल का? आमच्या शेतीला नेमके काय झाले आहे. ते म्हणाले, तुमच्या पाण्याचा निचरा होत नाही. ते उन्हात गरम झाले त्यात शेती भाजून गेले. तुम्ही फवारणी केली. पण नेमका आजार कोणता आहे हे आम्हाला सांगता यायचे नाही. ते शास्त्रज्ञ सांगतील. आम्हाला औषधे दिली आहेत ती आम्ही तुम्हाला दिली. आता तुमची शेती आणि तुम्ही तुमचे पाहून घ्या. कृषीविभागाच्या अधिका-याने दिलेले हे उत्तर ऐकून शेतकरी गांगरून गेला. हरकुळ खुर्द गावातील हा किस्सा.. असाच अनुभव मुलखातील अनेक गावातील शेतक-यांना येत आहे. सरकार कोलमडलेल्या शेतक-याला आता नुकसानभरपाईचा तरी आधार देणार का?
भातशेती फक्त गाई-वासरांसाठी
मुलखात आता भातशेती करणे परवडत नाही. तांदूळ रेशनवर मिळतील, हवे तर विकत आणता येतील. परंतु मुक्या जीवांना लागणारे वैरण रेशनवर मिळत नाही ना दुकानात, यामुळे गवतासाठी म्हणून शेती करणारे शेतकरी अनेक आहेत. अशातच झालेल्या निळेभुंगे, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-याने काय खावे आणि शेतीत कशी सुधारणा करावी याचा प्रश्न आहे.
चाळीस टक्के धरणे तहानलेलीच
सिंधुदुर्गात लहान-मोठी तीस धरणे आहेत. त्यातील २१ लघुपाटबंधारे २ मध्यम पाटबंधारे तर अन्य छोटी मोठी तलावं आहेत. या तलावांतील ४० टक्के धरणांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा संपत आला तरीही ही तलावे भरलेली नाहीत. रत्नागिरीतही अशीच स्थिती आहे. कोयना तर पावसाच्या भेटीसाठी आतुरलेले आहे. संपत चाललेल्या पावसाळ्य़ाने शेतकरी धास्तावला, नद्यांचे पाणी रोडावले आहे. तुडुंब असणा-या विहिरींचे पाणी आटले आहे. हिरव्यागार कोकणात आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
परतीच्या पावसावरच भिस्त
पावसाळय़ातील तुफानाचे पारंपरिक महिने संपले. आता भिस्त आहे सप्टेंबरकडे आणि परतीच्या पावसावर. या महिन्यात तो आपला अनुशेष भरून काढेल की मानवाला अनुशासित करेल याची चिंता आहे. पाण्यासाठी दीन दीन फिरवायला लावेल की काय अशी भीती वाटू लागली आहे. राज्यातील अन्य क्षेत्रांपेक्षा निष्टिद्धr(155)तच कोकणात भरपूर पाऊस पडला आहे. हे खरे असले तरी यावर्षीच्या पावसाळय़ाने सर्वात निचतम पातळी गाठली आहे. दरवर्षी तीन महिन्यात सरासरी दोन हजार मि.मी. पडणारा पाऊस यावर्षी कसाबसा एक हजार मि.मी. कोसळला आहे. रोडवलेल्या पावसामुळे जलस्रोतही कोरडेच आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. यावर्षी आजमितीअखेर सिंधुदुर्गात ४१ मि.मी. तर रत्नागिरीत ५० मि.मी. पावसाने सरासरी गाठली आहे.
कोकण तर देवाचे लाडके
महाराष्ट्र हे लाडके आणि त्यात कोकणही देवभूमीच आहे. येथे पाण्याची टंचाई भासणे म्हणजे देवाला संकटात टाकण्यासारखे आहे. हे मत आहे स्टॉक होम जलपुरस्कार मिळालेले डॉ. राजेंद्र सिंह यांचे. जोहडकार म्हणून प्रसिद्ध असणारे विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हे राजस्थानातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधताना कोकणातील जलसंपदा पाहून हरकून जातात. अलीकडेच त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. कोकणातील हिरवाई त्यांनी पाहिली अन् भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याचा जबाबदारी या मातीनेच घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले.
माणसे बदलली आणि निसर्गही बदलला
मदतीला हात नाहीत, मजुरांनी शेती परवडत नाहीत. म्हणून अनेक शेती क्षेत्र ओस पडले. शासकीय धोरणेही उदासीन, संकटांचा सामना सुरूच राहिल्याने यावर्षीच्या पावसाळय़ात पन्नास टक्क्यांहून कमी क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आले आहे. त्या क्षेत्रातून चाळीस टक्केच पीक येईल अशी भीती वाटते आहे. पावसाळी क्षेत्राला पाण्याची सोय होईलच याची शाश्वती देता येत नाही. सारी भिस्त पावसावरच असते.
भात शेतीला पावसाचे डोहाळे
फुलो-यावर आलेली भातीशेतीला सध्या पावसाचे डोहाळे लागले आहेत. तिला पाऊस हवा आहे. त्याच्या अवेगाने ती दु:खी-कष्टी झाली आहे. काही भागात फिकी पडली आहे. तर कुठे-कुठे दु:खाने गर्भगळीत झाली आहे. आपला रंग ती विसरली आणि करपून गेली. यैवनात येण्यापूर्वीच पावसाने तिचे तारुण्य ओरबडले आहे. ती कोमेजून गेली आहे. शेतक-याने मात्र?आशा सोडलेली नाही. अष्टमीनंतर तो बरसेल आणि उरले सुरले क्षेत्र तरी सावरेल असे त्याला वाटते आहे.