अपघात किंवा तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्ताची गरज लागते. हे रक्त तत्काळ उपलब्ध होईल याची शक्यता नसते.
नवी दिल्ली – अपघात किंवा तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने रक्ताची गरज लागते. हे रक्त तत्काळ उपलब्ध होईल याची शक्यता नसते. त्यातच रक्तगटाची मोठी समस्या उभी राहते. या सर्व अडचणींवर मात करणारे संशोधन दिल्ली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यांनी हिमोग्लोबिनवर आधारित रक्ताला पर्याय विकसित केला आहे. हे पर्यायीहिमोग्लोबिन पूर्णपणे सुरक्षित असून ते सहजपणे अन्यत्र नेता येऊ शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या जैवरसायन विभागाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने हा शोध लावला आहे. प्राध्यापक सुमन कुंडू यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले आहे. प्रयोगशाळेत बनवलेल्या या पर्यायी हिमोग्लोबिनचे पेटंट घेण्यासाठी अर्ज केला आहे. हा पर्याय कमी खर्चात तयार होऊ शकतो. तसेच तो तीन वर्षे टिकू शकतो. त्याचबरोबर प्रत्येक रक्तगटाला तो चालू शकतो आणि तो साठवणेही सोपे आहे, असे कुंडू म्हणाले.
सध्या रक्ताची गरज लागल्यास अन्य रक्तदात्याकडून रुग्णाला द्यावे लागते. जगभरात ही पद्धत अस्तित्वात आहे. मात्र, हे रक्त कायम कमी पडते. हा तुटवडा भरून काढण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरतात. त्यामुळे जगभरात रक्ताला पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीच्या शास्त्रज्ञांनी रक्ताला पर्याय म्हणून ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ (कृत्रिम हिमोग्लोबिन) तयार केले आहे, असे ते म्हणाले.भारतात एक बाटली रक्तासाठी हजार ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. मात्र हे ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ १० ते १२ टक्के स्वस्त कि मतीत उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे रक्त साठवणुकीची क्षमता ४० ते ५० दिवस असते. मात्र, हे ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ तीन वर्षे साठवता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
या ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’ मधील ‘हेम’ हा घटक हिमोग्लोबिनला चिकटून राहतो. तो अन्य रासायनिक प्रक्रियांमध्ये हे सहभागी होते. या नवीन पदार्थातील अमिनो अॅसिडमध्ये बदल केला आहे. त्यामुळे ते अन्य रसायनांमध्ये मिसळू शकते. नैसर्गिक हिमोग्लोबिनमधील सर्व घटक या कृत्रिम हिमोग्लोबिनमध्ये आढळतात. सध्या या ‘आर्टिफिशयल हिमोग्लोबिन’च्या चाचण्या सुरू आहेत. येत्या दोन ते तीन वर्षात त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू होऊ शकेल. हे संशोधन ‘जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्री’ च्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.