संयमाने वागा, हिंसा करू नका, स्वत:चे जीवन संपवू नका, असे भावनिक आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठा बांधवांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
मुंबई- मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर पेटले आहे. या आंदोलनात मराठा तरुणांना पोलिसांचा मार खावा लागत आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून तरुणांवर गुन्हे दाखल होत आहेत, तर काही तरुण आत्महत्या करून आपले जीवन संपवत आहेत. यात आपले राज्य आणि मराठा समाजाचेच मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठा बांधवांना माझे आवाहन आहे की, संयमाने वागा, हिंसा करू नका, स्वत:चे जीवन संपवू नका, असे भावनिक आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी आंदोलकांना केले आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात उसळलेल्या आंदोलनाने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मराठा समाजातील आंदोलकांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
ही कायदेशीर प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा बांधवांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. मात्र काही लोक जाणीवपूर्वक हे आंदोलन चिघळत ठेवण्यासाठी मराठी तरुणांचा वापर करीत आहेत. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात रस दिसत नाही. हे आंदोलन चिघळून मराठा तरुणांचेच मोठे नुकसान होत आहे.
या हिंसक आंदोलनामध्ये या तरुणांना पोलिसांचा मार खावा लागत आहे. इतर काही ठिकाणी या तरुणांवर गुन्हे दाखल होत आहेत. हे या तरुणांचे नुकसान आहे. जेव्हा हे खटले न्यायालयात उभे राहतील तेव्हा खटले चालविण्यासाठी येणारा खर्च, न्यायालयात मारावे लागणारे खेटे याचा या तरुणांना खूप मोठय़ा प्रमाणात त्रास होऊ शकतो. तेव्हा आता चिथावणी देणारे कोणीही या तरुणांच्या मदतीला येणार नाहीत. त्यामुळे मराठा तरुणांनी संयम ठेवावा, असे आवाहनही नारायण राणे यांनी केले आहे.