नरेंद्र मोदी यांचे सरकार म्हणजे ८०० वर्षानंतर देशात हिंदूंचे सरकार आले आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीआयचे (एम) खासदार सलीम यांनी लोकसभेत सोमवारी केला.
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांचे सरकार म्हणजे ८०० वर्षानंतर देशात हिंदूंचे सरकार आले आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचा आरोप सीपीआयचे (एम) खासदार सलीम यांनी लोकसभेत सोमवारी केला.
सलीम यांच्या विधानाने संतप्त झालेल्या राजनाथ सिंह यांनी त्यावर आक्षेप घेऊन माफीची मागणी केली. सलीम यांच्या विधानामुळे लोकसभेत गदारोळ माजला. अखेर हे विधान कामकाजातून काढून टाकल्यावर चर्चेला सुरुवात झाली. संसदेचे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लोकसभेत असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर अपेक्षेप्रमाणे चर्चेला वादळी सुरुवात झाली.
सीपीआय (एम)चे खासदार मोहम्मद सलीम यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या आरोपामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली. मोदी यांचे सरकार म्हणजे ८०० वर्षानंतर देशात हिंदूंचे सरकार आले आहे, असे विधान सिंह यांनी केल्याचा आरोप सलीम यांनी चर्चेत केला. या विधानावर राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
माझ्या संसदीय कारकिर्दीत प्रथमच या आरोपामुळे दु:खी झालो आहे. हा गंभीर आरोप आहे. हे विधान केल्यानंतर कुठलाही गृहमंत्री त्या पदावर राहू शकत नाही. मी बोलताना अतिशय जबाबदारीने बोलतो. त्यामुळे सलीम यांनी जो आरोप केला आहे तो सिद्ध करून दाखवावा, अन्यथा त्यांनी माफी मागावी, अशी मागणी राजनाथ सिंह यांनी केली.
सिंह यांचे नियतकालिकात प्रसिद्ध झालेले विधान मी केले. ते खोटे असल्यास राजनाथ यांनी त्या प्रसारमाध्यमाला कायदेशीर नोटीस पाठवावी, असे प्रत्युत्तर सलीम यांनी दिले. दोन्ही बाजूंकडून गदारोळ वाढल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी काही वेळासाठी कामकाज तहकूब केले.