हिंदुंनी कमीत कमी चार मुलांना जन्म द्यावा, असे वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी मुक्ताफळे उधळणे सुरूच ठेवले आहे.
मेरठ- भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी हिंदुंनी कमीत कमी चार मुलांना जन्म द्यावा, असे वादग्रस्त वक्तव्य करुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. मेरठमधील संत समागमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे खळबळजनक विधान केले.
काही दिवसांपूर्वी याच साक्षी महाराजांनी नथूराम गोडसे हा राष्ट्रभक्त असल्याचे विधान करत वाद ओढावून घेतला होता. भाजपा आणि आरएसएस नेत्यांमधील वादग्रस्त वक्तव्य करण्यांना ताकीद म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला होता. मात्र मोदींच्या इशा-याला न जुमानता भाजप नेत्यांनी मुक्ताफळे उधळणे सुरूच ठेवले आहे.
‘घर वापसी’चे समर्थन करतानाच हिंदू धर्माचे रक्षण करायचे असेल तर प्रत्येक हिंदू महिलेने कमीतकमी चार मुलांना जन्म दिलाच पाहिजे, असे ते म्हणाले. या चारपैकी एक मुलगा देश सेवेसाठी आणि एक मुलगा हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने द्यायलाच हवा, असे त्यांनी ठणकावून सांगितले. अयोध्येत राम मंदिर बांधणार आणि थोड्याच दिवसात धर्मांतरविरोधी कायदा संसदेत मंजूर होईल, असेही त्यांनी सांगितले.
यात भरीस भर म्हणून की काय, साक्षी महाराजांच्या या वक्तव्याला साध्वी प्राची यांनीही पाठोपाठ समर्थन दिले. ‘घर वापसी’ ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि ती कधीही थांबणार नाही. भारत हा हिंदूंचा होता, हिंदूंचा आहे आणि हिंदूंचाच राहील, असे त्या म्हणाल्या.