मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खाचरातील पाणी वाहून गेल्यामुळे शेती भातशेती सुकू लागली होती.
अलिबाग – मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खाचरातील पाणी वाहून गेल्यामुळे शेती भातशेती सुकू लागली होती. तीन दिवस पडत असलेल्या हस्त नक्षत्राच्या पावसामुळे शेतजमीन ओली झाली आहे. या पावसामुळे दाणे भरतील. कीड रोगाचा फैलाव कमी होईल. हस्ताचा हा पाऊस भात शेतीसाठी संजीवनी ठरणार आहे.
यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. त्यामुळे शेतीची कामे देखील उशिरा सुरू झाली. पावसाची प्रमाण कमी असले तरी पीक परिस्थिती चांगली होती. परंतु अचानक पावसानी दडी मारली. ऊन पडू लागले. त्यामुळे एकीकडे खाचरातील पाणी कमी होऊन जमीन सुकू लागली होतील.
खारेपाटातील शेती करपू लागली होती. भातपीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. वातावरणातील बदलामुळे भात पिकावर काही भागात करपा व कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे भातशेती संकटात आली होती. परंतु हस्ताच्या पावसाने भातशेतीला जीवदान दिले आहे.
करपा रोगामध्ये भाताच्या पानावर लांबट गोल आकाराचे राखाडी ठिपके आढळून येतात. कडाकरपा रोगामध्ये पानाचे शेंडे आणि कडा पिवळसर रंगाच्या होतात. पानाच्या कडा करपल्यामुळे या रोगास कडाकरपा असे म्हणतात. भात पिकावर काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
शेतात ठिकठिकाणी तुडतुडय़ाने खोडातील अन्नरस शोषल्यामुळे करपून गेलेले गोलाकार भाताचे पिक दिसते. त्या ठिकाणी भातपिकाच्या खोडावर असंख्य तुडतुडे आढळून येतात. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची योग्यवेळी फवारणी करणे आवश्यक आहे. या वर्षी रायगड जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरवर भात शेती करण्यात आली आहे.
३१ लाख ८४ हजार क्विंटल भाताचे उत्पादन अपेक्षीत आहे. चांगले उत्पादन यावे यासाठी शेतक-यांना सुधारित बियाणे देण्यात आली आहेत. एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेतून कीडरोग नियंत्रणासाठी आठवडय़ातून चारदिवस शेतीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी ४८ निरीक्षकांची नेमणूक करणायत आली आहे. कीडरोग आढळून आल्यास त्याची माहिती शेतक-यांना दिली जात आहे. कामगंध सापळा व पिवळे सापळे शेतक-यांना देण्यात आले आहेत.
यंदा केवळ ६० टक्के पाऊस झाला आहे. पाऊस कमी असला तरी शेतीचे नुकसान होणार नाही. पाऊस कमी असल्यामुळे खारेपाट विभागात शेती करपू लागली होती. कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे पावसाची गरज होती. या पावसामुळे खारेपाटातील शेतीला व हळव्या जातीच्या शेतीला संजीवनी मिळणार आहे. वा-यामुळे शेती आडवी झाली तरी नुकसान
होणार नाही.
– के. बी. तरकसे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , रायगड