उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणी वितरणात होणा-या भेदभावाविरोधात ‘स्वाभिमान’ संघटनेने पत्रकार परिषद घेत एल्गार पुकारला आहे.
उल्हासनगर – उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणी वितरणात होणा-या भेदभावाविरोधात ‘स्वाभिमान’ संघटनेने पत्रकार परिषद घेत एल्गार पुकारला आहे. ज्या भागात पाणी मिळत नाही, टँकर येत नाही, व्यावसायिक वापरासाठी पिण्याचे पाणी अवैध पद्धतीने वापरले जात असेल, तेथील नागरिकांनी ‘स्वाभिमान’ संघटनेच्या ०२५१-२५२०९९९ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन ‘स्वाभिमान’ संघटनेचे जिल्हा संघटक रोहित साळवे यांनी केले आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पाणी वितरण पद्धत सदोष आहे. महापालिकेला एमआयडीसी सुमारे १२० एमएलडी पाणीपुरवठा करते. हे पाणी पुरेसे असतानाही उल्हासनगर महापालिका हद्दीत टोकाच्या भागातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे या नागरिकांना पाणीपुरवठय़ासाठी मोफत टँकरसेवा देण्यात येते. मात्र हे टँकर्स शहराच्या मध्य भागातील इमारतींना राजरोस पाणी पुरवताना दिसतात. शिवाय या टँकर्सचा आकडाही बनावट असून हे टँकर व्यावसायिकांनाही पाणीपुरवठा करतात. महापालिका पाणीपुरवठा विभागात कर्मचा-यांचा तुटवडा असून अशा अनेक कारणांमुळे उल्हासनगरवासीय सध्या कमालीचे हैराण झाले आहेत.
यावरोधात ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेने आवाज उठवल्याने येत्या काळात उल्हासनगरचे पाणी पेटण्याची शक्यता आहे. महामोर्चा काढून जल खात्याला जागे करण्यासाठी जिल्हा संघटक रोहित साळवे, रेवण शिंदे, विजय गायकवाड, विशाल सोनावणे, शेखर ठोसर, मंगेश हिवराळे, सुशांत कांबळे, आनंद देशमुख यांनी रविवारी टाऊन हॉल येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहित साळवे म्हणाले की, ‘गायकवाड पाडय़ातील टँकर पॉइंटवरून दिवसाला १५० टँकर कॅम्प ४ व ५ साठी पाठवले जातात. यासाठी महापालिका महिन्याला १६ लाखांपेक्षा जास्त खर्च करते. नवीन वितरण योजना टाकण्यासाठी कोणार्क कंपनीला ३०० कोटी रुपये दिले आहेत. मात्र या योजनेतील कराराप्रमाणे कोणार्क कंपनीने काम केलेले नाही, असे असताना ठेकेदाराचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले नाही. तसेच इतका खर्च करूनही शहरात पाणी वितरण योग्य पद्धतीने का होत नाही? याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असणार आहे.
तर ‘स्वाभिमान’ स्टाईल दाखवणार
उल्हासनगरवासीयांना पाण्यासंबंधी भेडसावणा-या समस्या ‘स्वाभिमान’ संघटनेपर्यंत पोहोचाव्यात. यासाठी ०२५१-२५२०९९९ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचा टँकर व्यावसायिक वापरासाठी दिला गेल्याची तक्रार आल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचून ‘स्वाभिमान’ स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा रोहित साळवे यांनी दिला आहे. हे आंदोलन चिघळणार असल्याचटी बाब ‘स्वाभिमान’ संघटनेचे पदाधिकारी पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांच्या कानावर टाकणार असल्याचेही साळवे यांनी यावेळी सांगितले.