कालनिर्णय
परंपरेच्या कोंदणात मनामनात कोरून ठेवलेले नाव म्हणजे कालनिर्णय. यंदाचा दिवाळी अंक हा दरवर्षीप्रमाणे विविध विषयांनी सजविलेला आहे. अनेक प्रश्नांना समोर घेऊन बनवलेला हा दिवाळी अंक दीपावलीच्या या निर्मल प्रकाशात त्यावर उजेड टाकत आहे. यातील खास आकर्षण ठरणारे कालनिर्णयसाठी दरवर्षी हायकू लिहिणा-या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी-लेखिका शिरीष पै यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनेक हायकू समवेत फुलांवरचा एक लेख या दिवाळी अंकाचे महत्व वाढवत आहे. वीस वर्षानंतर जग कुठे असेल -संदीप वासलेकर यांचा विशेष लेख, रशिया नावाचं विवर -डॉ. शरद वर्दे, अफू एक नशा, एक शस्त्र -निळू दामले, भारतीय मुस्लिमांच्या मानसिकतेचे अंतरंग- उदय माहूरकर, इतिहासाला स्मृतिभ्रंश झाला आहे- वसंत लिमये (साहस), अकबर पदमसी: एक प्रयोगशील आधुनिकतावादी यांच्या चरित्रावर आंधारित लेख- राजेंद्र, जॉन ल कार: एक सिद्धहस्त हेरकथा लेखक यांच्या लेखनशैलीवर भाष्य करणारा लेख-शेखर साठे यांचा लेख, जपानी खरायकिसनची कहाणी हा पंकज भोसले यांचा स्पेशल रिपोर्ट, डॉ वसंत पटवर्धन, नंदिनी देशमुख आणि मानसी देशमुख यांच्या कथा अशोक राणे यांचा सिनेमातला सिनेमा यासोबतच उदय माहूरकर, माधव शिरवळकर, सुलक्षणा महाजन अभिजित बेल्हेकर, सुहास जोशी, शामिल पटवर्धन, अमूल पंडित, प्रसाद कांबळी, डॉ अशोक कामात अशा नामवंत लेखकांच्या लेखांनी हा लेख समृद्ध झाला आहे.
संपादक प्रकाशक : जयराज साळगावकर
मूल्य: १२५ रुपये , पृष्ठे: २०८
चिंतन आदेश-प्रेम
सालाबादप्रमाणे यंदाही चिंतन ग्रुपने आपल्या चिंतन आदेश या दिवाळी अंकातून एका विशिष्ठ विषयाला वाहिलेल्या अंकाची खासियत जपली आहे.
यंदाचा दिवाळी अकं ‘प्रेम’या संकल्पनेला वाहिलेला आहे. माणसाचे आयुष्य प्रेमाविना व्यर्थ आहे. मग ते प्रेम आध्यात्म, साहित्य, संस्कृती अशा कोणत्याही क्षेत्रातले असो. चिंतन आदेश यांनी यंदाच्या दिवाळीचा विषय सुद्धा प्रेम आहे. संपादक अभिनंदन थोरात म्हणतात,‘‘ प्रेमाचे विविध अविष्कार पाहायला मिळतात. मग ते प्रेम पती पत्नीवरचे असो, मुले व आईवडिलांचे प्रेम असो, मित्र मैत्रिणींचे प्रेम असो अशा अनेक छटा अंकामध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रेमाच्या शिल्पकारांनी या अंकामध्ये आपले प्रेम व्यक्त केले आहे. ’’ सध्याच्या पिढीची प्रेम या भावनेची व्याख्या काहीशी वेगळी झालेली दिसते. पण अशाच एका वळणावर प्रेमाचा खरा अर्थ आपल्या कथा, कवितांच्या माध्यमातून चिंतन आदेश यांच्या ‘प्रेम’ या दिवाळी अंकामध्ये वाचकांना वाचायला मिळणार आहेत. सुरेश द्वादशीवार, राजीव साबडे, प्र. चिं. शेजवलकर यांनी चिंतन आदेशच्या दिवाळी अंकामध्ये सहयोग आहे.
मूल्य : १०० रुपये, पृष्ठे : ३१८
चित्रलेखा
यंदाचा चित्रलेखा दीपोत्सव २०१७ हा दिवाळी अंक नानाविध विषयांना एकत्रित करून संकलित करण्यात आला आहे. जाती धर्माच्या वेढय़ात छत्रपती शिवाजी महाराज.. हा डॉ. आनंद पाटील यांचा विशेष लेख यात समाविष्ट केला गेला आहे. मृत्यू वीतभर अंतरावर या सदरात निधी चाफेकर यांची थरारकथा मोना शेठ यांनी लिहिली आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा प्रेरणादायी प्रवास- अमित बडे यांनी लिहिला आहे. चित्रलेखा सदाबहार या भागामध्ये वजू कोटक, ज्ञानेश महाराव, सागर राजहंस, डॉ. अशोक राणा, नितीन बानगुडे पाटील, अमोल कडू, प्रमोद ताम्हणकर, इशिता यांसारख्या लेखक-लेखिकांनी लेखन केले आहे. रंग अभंग या विभागात सुनील खांडबहाले, संजय वायाळ, अशोक मुले, शब्बीर अन्सारी, जेसन लुईस यांचे लेखन वेगवेगळ्या विषयवार प्रकाश टाकणारे आहे. सचिन परब यांच्या इंद्रपद हादरविणा-या कविता, लाईटची बदलती स्टाईल हा समीर करंबे यांचा लेख, घनश्याम देशमुख यांची स्पेशल हास्यचित्रे यात समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
संस्थापक : वजु कोटक, सहसंस्थापक: माधुरी कोटक, मूल्य: ५० रुपये
चारचौघी
संपादक रोहिणी हट्टगडी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा दिवाळी अंक पूर्ण झाला आहे तर, डॉ. आशिष देशपांडे यांनी मानसिक आरोग्यावर विशेष अंक लिहिला आहे. त्यामध्ये असा मी, कसा मी? भ्रमप्रक्षेपण, रूपांतरमी नाकारण, विरूपण अशा गोष्टींवर भाष्य केले आहे. या बरोबरीनेच भा. ल. महाबळ, माधवी कुंटे, शरद वर्दे, गुरुनाथ तेंडुलकर, शेखर गजभार, सविता वाळिंबे-शेट्टी, सुमेध आदवडे, शुभा नाईक, प्रियंवदा करंड, स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या कथांनी दिवाळी अंक अधिक सजला आहे. त्याच बरोबरीने स्मिता जोगळेकर यांचा टिटोनियमची कवटी आणि लोखंडाच शरीर या विषयावर कथा आहे.
मूल्य : १०० रुपये, पृष्ठ : २२८