ठाणे, रायगड जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढत असताना कल्याण-डोंबिवलीतही स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण वाढत आहेत.
कल्याण – ठाणे, रायगड जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढत असताना कल्याण-डोंबिवलीतही स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण वाढत आहेत. तर महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात पूर्णवेळ फिजिशियन डॉक्टर नसल्याने संशयित स्वाईन फ्लूच्या रुग्णांची तात्पुरती नोंद करून उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे.जे, कस्तुरबा व शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठवले जात आहे.
त्यासोबतच स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले ‘९५ मास्क’चीही कमतरता आहे. त्यामुळे दुय्यम दर्जाच्या मास्कची विक्री वाढत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरात ठिकठिकाणी स्वाईन फ्लूबाबत काळजी घेण्यासाठी तसेच प्रतिबंधासाठी माहिती देणारे फलक लावले आहेत. अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी स्मिता रोडे यांनी दिली.
स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण वाढत असल्याने राज्य आरोग्य विभागाची वाढीव विशेष पथके कल्याण-डोंबिवली शहरात पाठवण्याची मागाणी कल्याण पश्चिमेतील आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
तर स्वाईन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महत्त्वाच्या असलेले एन ९५ मास्क बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. तर हलक्या प्रतिचे मास्क दुप्पट दराने विकले जात आहे.
एन १ एच १ विषाणूपासून रक्षणासाठी ९५ मास्क महत्त्वाचे आहे. मात्र त्याचा पुरेशी उपलब्धता नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर वैजयंता घोलप यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्यात आठ महिन्यांत ५३६ रुग्ण
ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत स्वाईन फ्लूचे ५३६ रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने जानेवारी ते ऑगस्टपर्यंत १ लाख ११ हजार ९९३ जणांची रक्ततपासणी केली आहे. यात ७६६ जणांची स्वाईन फ्लू संबंधित तपासणी करण्यात आली होती. ठाणे पालिका हद्दीत ३२६ जणांच्या तपासणीत २४० रुग्ण संशयित आढळले आहेत. तर ८ महिन्यांत स्वाईन फ्लूने १५ जणांचा मृत्यू झाला आहे.