परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदीबरोबर कौटुंबिक पातळीवरील आर्थिक व्यवहार जाहीर केल्यानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होईल, अशी माहिती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिली.
नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदीबरोबर कौटुंबिक पातळीवरील आर्थिक व्यवहार जाहीर केल्यानंतर संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होईल, अशी माहिती काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिली. ललित मोदी आणि व्यापमंप्रकरणी काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तीन आठवडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एकही दिवसाचे कामकाज झालेले नाही.
स्वराज यांच्यावर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की, स्वराज यांनी अत्यंत गुप्तपणे आणि उदार भावनेने ललित मोदी यांना मदत केली. ते गुन्हेगार असतानाही त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्या कुटुंबीयांना ललित मोदीकडून त्यांच्या बॅँक खात्यात किती पैसे आले ही बाब त्यांनी देशाला जाहीरपणे सांगावी, असे त्यांनी सांगितले.
संसदेचे कामकाज सुरू राहावे, असे आम्हालाही वाटते. मात्र, आम्ही मूळ मुद्यालाच हात घातलेला आहे. सुषमा स्वराज, वसुंधरा राजे व शिवराजसिंह चौहान यांनी बेकायदेशीर कृत्य केलेली आहेत. मध्य प्रदेशात एकामागोमाग खून होत असताना पंतप्रधानांना त्यावर वक्तव्य करणे आवश्यक वाटत नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील वस्तुस्थितीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. यामुळे मध्य प्रदेशच्या हजारो नागरिकांच्या भविष्याकडे पाठ फिरवली गेली आहे. तर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही ललित मोदी प्रकरणात केवळ गुन्हेगाराशी व्यावसायिक संबंध जोडले. तरीही पंतप्रधान त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
स्वराज यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या भाषणात ललित मोदींना मानवतेच्या भूमिकेतून मदत केल्याचे जाहीर केले. हे ऐकून आम्हाला आनंद झाला. तुम्हाला मानवतेच्या भूमिकेतून मदत करायची होती तर तुम्ही गुप्तपणे का केलीत? तुमच्या संपूर्ण खात्याला का सांगितले नाहीत. संपूर्ण देशाला का सांगितले नाही, असा सवाल गांधी यांनी केला.
देशातील विविध तपास यंत्रणांना ललित मोदी हवा आहे. तुमच्यात आणि त्यांच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार झाले याची माहिती देशाला व संसदेला द्यावी, असा नेमका प्रश्न मी विचारत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत ते म्हणाले की, आंध्र प्रदेशच्या जनतेचा तो हक्कच आहे. केंद्राने त्याबाबत तातडीने पावले उचलायला हवीत. कॉँग्रेस पक्ष या मागणीसाठी लढा देईल.