पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्मार्ट फोनमध्ये ‘कॅलक्युलेटर अॅप’ वापरण्यास सुरुवात केली आहे.
श्रीनगर- पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्मार्ट फोनमध्ये ‘कॅलक्युलेटर अॅप’ वापरण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानामुळे लष्कराला दहशतवाद्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही.
यंदा पाकव्याप्त काश्मीरातून भारतात घुसखोरी वाढली आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही एसएमएस राहत नसल्याचे लष्कराच्या तंत्रज्ञान विभागाला आढळले.
‘जैश-ए-मोहम्मद’च्या काही दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर लष्कराला ‘कॅलक्युलेटर’ तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. हे तंत्रज्ञान अमेरिकन कंपनीने ‘हरिकेन’ वादळाच्यावेळी वापरले होते. या तंत्रज्ञानामुळे नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात राहता येते.
स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर नेटवर्क नसतानाही संबंधित व्यक्तीला वापरता येते. विशेष म्हणजे या अॅपद्वारे स्मार्टफोनवर इतरांना संभाषण करता येत नाही. तसेच त्याचे नेटवर्कही मिळत नाही.
पण, हे अॅप डाऊनलोड केलेल्या दुस-या स्मार्टफोनशी संपर्क साधता येतो. दहशतवादी आपले स्मार्टफोन बंद करून त्याचे रुपांतर रेडियो सेटस्मध्ये करतात. त्यांना त्यांच्या हॅँडलर्सकडून भौगौलिक प्रदेश, रस्ते आदींची माहिती मिळत असते.