इंटरनेट, सोशल नेटवर्किंग, कॅमेरा, व्हीडिओ यांसारख्या सुविधा देणा-या स्मार्टफोन्सनी भारतीयांवर चांगलीच भुरळ घातली आहे.
नवी दिल्ली – इंटरनेट, सोशल नेटवर्किंग, कॅमेरा, व्हीडिओ यांसारख्या सुविधा देणा-या स्मार्टफोन्सनी भारतीयांवर चांगलीच भुरळ घातली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत स्थानिक बाजारपेठेत एक कोटी ४५ लाखांहून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत तब्बल २१९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मात्र याचवेळी फ्युचर फोनच्या विक्रीला फटका बसला असून या फोनच्या विक्रीत ६.५ टक्क्यांची घट झाली.
सायबर मीडिया रिसर्च (सीएमआर) या संस्थेच्या अहवालानुसार २०१२-१३ च्या अखेरच्या तिमाहीत भारतात ६६ लाख स्मार्टफोनची विक्री झाली होती. मात्र यंदा हा आकडा १ कोटी ४५ लाखांवर गेला आहे. यामध्ये थ्री-जी फोन्सची मोठी विक्री झाली. मात्र तिस-या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत विक्री केवळ १.९ टक्क्यांनीच वाढली असल्याचे सीएमआरने म्हटले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत १ कोटी ४२ लाख स्मार्टफोनची विक्री झाली होती.